Jayant Patil Sarkarnama
कोकण

Jayant Patil Defeat : जयंत पाटलांनी विधान परिषद न लढवणं शहाणपणाचं ठरलं असतं; महेंद्र दळवींचा टोमणा

Vijaykumar Dudhale

Raigad, 18 July : विधान परिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशीच मी जयंत पाटील यांचा बळी जाणार, असे भाकीत केले होते. कारण, शेकापची महाराष्ट्रातील ताकद संपलेली आहे. त्यांच्याकडे केवळ एकच आमदार आहे. त्यांचेही मतपरिवर्तन झाल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे जयंत पाटील यांनी विधान परिषदेची निवडणूक न लढवणं, हा शहापणाचा निर्णय ठरला असता, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याला उत्तर देताना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाचे (PWP) दत्ता पाटील व इतर नेत्यांची कार्यप्रणाली सर्वसामान्यांना भावणारी होती. पण त्यांच्या नंंतरी म्हणजे मीनाक्षीताई पाटील यांच्यानंतरची पिढी जयंत पाटील (Jayant Patil), पंडीत पाटील आणि त्यांच्या वारसदारांची जनमाणसांतील क्रेझ संपलेली आहे.

जयंत पाटील यांना विधान परिषदेत तीन ते चार वेळा संधी मिळाली होती. संख्याबळ पाहता जयंत पाटील यांनी ही निवडणूक लढविणं योग्य नव्हतं. पण, त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली आणि पदरी अपयश आले, असेही आमदार दळवी यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील यांनी आतापर्यंत राजकारणात अनेक चुका केल्या आहेत. त्यातील एक चूक म्हणजे पुरेसं संख्याबळ हातात नसतानाही विधान परिषद निवडणूक लढविण्याचा घेतलेला निर्णय. निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नसता तर त्यांची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. पण, निवडणूक लढवून त्यांच्या पदरी अपयश आले आहे. कारण, त्यांच्या पक्षाकडे जनाधारच नव्हता. त्यांच्याकडे मतंच नव्हती. त्यांना जी बारा मतं मिळाली आहेत, त्यातील बहुतांश लक्ष्मीदर्शनाची होती, असा दावाही महेंद्र दळवी यांनी केला.

दळवी म्हणाले, माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती आमदार होऊ शकला. आता विधान परिषदेत झालेला जयंत पाटील यांचा पराभव, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत तर शेकापचा सुफडा साफ करूनच टाकेन. कारण त्यांच्याकडे आता काही उरलेले नाही.

रायगड जिल्ह्यातील सातही आमदार आणि दोन खासदार महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती महायुतीला अनुकूल आहे. सरकारचे काम आम्ही जनतेपर्यंत पोहोचवल्याने असे बदल होत राहतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT