Mahayuti Vs MVA : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच, कोकण (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीवरून कोकणच्या राजकारणात मोठा भडका उडाला आहे. महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याची चर्चा असतानाच शिवसेना आमदाराच्या कन्येने थेट अपक्ष अर्ज भरल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतही रस्सीखेच दिसून येत असल्याने या निवडणुकीतील राजकीय रंगत कमालीची वाढली आहे.
'पालकमंत्री' पदाच्या बदल्यात 'तटकरें'ना संधी?
महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्राथमिक चर्चेनंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार हे निश्चित मानले जात आहे. इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आधीच वाद सुरू आहे. ही निवडणूक कोणत्याही वादाशिवाय पार पाडण्यासाठी एक नवी तडजोड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला सोडून मंत्री भरत गोगावले यांना शांत करायचे आणि विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंना द्यायची, असा हा संभाव्य फॉर्म्युला आहे.
पण महायुतीचा फॉर्म्युला काहीही असला, तरी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि आमदारांनी थेट बंडाचे निशाण फडकावले आहे. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली दळवी यांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत वादाची पहिली ठिणगी पडली आहे. आमदार दळवी यांनी आपल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत गंभीर आरोप केले आहेत. "या जागेसाठी पक्षातील नेते 'बार्गेनिंग'करत आहेत," असा थेट आरोप दळवींनी केला असून राष्ट्रवादी काँग्रेसला आपला विरोध कायम राहील, असे ठामपणे सांगितले आहे.
शिवसेनेतच 4 इच्छुक:
या एका जागेसाठी केवळ महायुतीतच नाही, तर खुद्द शिवसेनेतच अंतर्गत स्पर्धा वाढली आहे. जुईली दळवी यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवाय मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी शिवसैनिकांनी ही जागा लावून धरली आहे. त्यातच आता माजी आमदार सदानंद चव्हाण आणि माजी आमदार राजन साळवी यांचीही नावे इच्छुकांच्या रेसमध्ये समोर आल्याने शिवसेनेतच मोठी चुरस निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीतही डोकेदुखी; 'शेकाप'मुळे गणिते बदलली
केवळ महायुतीच नाही, तर महाविकास आघाडीसमोरही या जागेवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी आमदार बाळ माने यांचे नाव निश्चित केले आहे. त्याचवेळी शेतकरी कामगार पक्षाने अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
थोडक्यात काय तर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही निवडणूक आता केवळ दोन आघाड्यांमधील राहिलेली नाही. महायुतीत अंतर्गत बंडखोरी आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटला आहे, तर महाविकास आघाडीत 'शिवसेना उबाठा विरुद्ध शेकाप' अशी थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कोकणचे हे राजकीय युद्ध आणखी कोणते वळण घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.