kiran samant narayan rane sarkarnama
कोकण

Kiran Samant News : ...अन् किरण सामंत नारायण राणेंच्या पाया पडले; भेटीगाठी वाढल्यानं चर्चांना उधाण

सरकारनामा ब्युरो

देशात लोकसभा निवडणुकीचं ( Lok Sabha Election ) बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पण, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ( Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency ) महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना की भाजपकडे जाणार याची उत्सुकता लागली आहे. शिवसेनेकडून किरण सामंत ( Kiran Samant ) आणि भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) ही दोन नावं प्रामुख्यानं चर्चेत आहेत.

यातच अलीकडे किरण सामंत ( Kiran Samant ) यांच्या राणे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या आहेत. नारायण राणे रत्नागिरी दौऱ्यावर असताना सामंत यांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. आता पुन्हा एकदा नीलेश राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रविवारी ( 17 मार्च ) किरण सामंत यांनी नारायण राणे यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

किरण सामंत यांनी माजी खासदार नीलेश राणे ( Nilesh Rane ) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, पाया पडून नारायण राणे ( Narayan Rane ) यांचे आशीर्वादही सामंत यांनी घेतले. यानंतर राणे आणि सामंत यांनी एकत्र स्नेहभोजनदेखील केलं. पण, त्यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली, याचा तपशील समजू शकलेला नाही. पण, या गाठीभेटी आणि वाढती जवळीक सध्या कोकणात चर्चेचा विषय ठरत आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री दीपक केसरकर यांनी आंगणेवाडीच्या यात्रेवेळी सूचक असं विधान केलं होतं. "महायुती मजबूत असताना कोण-कोणाच्या चिन्हावर लढेल, याला फार महत्त्व नसतं. कारण पालघरची जागा शिवसेनेला दिली, त्यावेळी भाजपनं आपला उमेदवारसुद्धा दिला होता. त्यामुळे जिथे जे चिन्ह चालतं आणि निवडून येण्याची शक्यता अधिक असते, तिथे आपला उमेदवार द्यायला कोणताच कमीपणा नसतो. नाही तर युती कशाला म्हणायचं?" असं केसरकरांनी म्हटलं होतं. एकप्रकारचे सामंतांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास ते भाजप चिन्हावर लढू शकतात, असं अप्रत्यक्षपणे केसरकरांनी सुचवल्याचं राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

त्याच पार्श्वभूमीवर सामंत आणि राणे यांच्यातील गाठीभेठी वाढल्याची चर्चा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात रंगली आहे. "रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडेच राहील ही काळ्या दगडावरील रेष आहे," असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे ही जागा भाजपला जाहीर झाल्यास उमेदवार कोण असेल, याचा सस्पेन्स अजून कायम आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT