Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav Sarkarnama
कोकण

रामदास कदम त्यावेळी माझ्या पाया पडले होते....: भास्कर जाधवांनी सांगितली 'ती' गोष्ट

सरकारनामा ब्यूरो

दापोली : रामदास कदम (Ramdas Kadam) तुम्ही सांगता की राष्ट्रवादीबरोबर (NCP) गेलेले आम्हाला पसंत पडलेले नाही. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंदुत्वाशी प्रतारणा केली. पण, रामदास कदम शपथ घेऊन सांगा की विधानसभेचे अधिवशेन चालू असताना मी त्यावेळी रत्नागिरीचा पालकमंत्री होतो. तुम्ही येऊन माझे पाय धरले. मला सांगितलं की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येतोय, तू मला विरोध करू नको. ह्या असल्या कदम यांच्या निष्ठा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला शिव्या देऊन उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचे काम करू नका, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल केला. (MLA Bhaskar Jadhav's criticism of Ramdas Kadam)

दापोलीतील शिवसंवाद यात्रेत आमदार जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर चौफेर टीका केली. ते म्हणाले की, रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर काढल्यानंतर डोळ्याला बाम लावून रडण्याचे नाटक करत होते. कदम यांच्यासारखा भंपक माणूस उभ्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही.

कदम यांनी सांगितले की मी १९७० पासून शिवसेनेचे काम करत होतो. मी शिवसेनेचा सच्चा, प्रामाणिक, निष्ठावंत शिवसैनिक आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. महाडमध्ये १९८५ मध्ये शिवसेनेचे एक शिबिर झाले. त्या शिबिरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रातील काही जागांवर आपण आमदारकीची निवडणूक लढवायची. त्यात एक रत्नागिरीची होती. त्यावेळी विजय ऊर्फ आप्पासाहेब साळवी यांना उमेदवारी दिली, तर खेडमधून किशोर कानडे यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी रामदास कदम हे केशवराव भोसले यांचे ड्रायव्हर म्हणून शिवसेनेच्या विरोधात प्रचार करत होते. ते वर्षे १९८५ आणि तुम्ही निष्ठा सांगता १९७० च्या. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला शाखाप्रमुखपदावरून काढून टाकलं होतं. हा इतिहास आहे, अशी आठवणही जाधव यांनी कदमांना करून दिली.

भास्कर जाधव म्हणाले की, तुम्ही १९९० मध्ये आनंद भोसले यांची विधानसभेची उमेदवारी हिरावून घेतली. तुम्ही १९९० ते २०२२ पर्यंत म्हणजे तब्बल ३२ वर्षे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी राहिला आहात. पण या ३२ वर्षांत सुद्धा तुम्ही शिवसेनेशी प्रामाणिक राहिला नाहीत. माजी खासदार अनंत गीते यांच्या विरोधात २०१४ मध्ये कदमांनी काम करत शेकापच्या रमेश कदमांना मदत केली आहे. तुम्ही प्रामाणिक कधी होता. पाच वेळा आमदार राहिलेल्या सूर्यकांत दळवींना पाडण्याचे काम रामदास कदमांनीच केले आहे. गीते यांच्या प्रचाराला २०१४ मध्ये स्वतः उद्धव ठाकरे आले होते, त्यावेळी तुम्ही त्या सभेलाही आला नव्हता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT