Raigad News : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी टीका केल्यानंतर तटकरे यांनी त्यावर पलटवार केला होता. तसेच गोगावले यांना जे पालकमंत्रीपद मिळाले आहे, त्यात आपला वाटा असल्याचे सुनावले होते. यावरून आता नवा वाद सुरू झाला असून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीसह सुनील तटकरेंवर संताप व्यक्त केलाय.
दळवी यांनी, पालकमंत्रिपदाचं श्रेय कसलं घेताय? तुमच्याचमुळे ते रखडलं होतं, असे म्हणत जोरदार पलटवार केला आहे. तर राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष असून, राष्ट्रवादीला आम्ही गणतीत पकडत नाही. भाजप आणि आमचे विचार जुळतात, असे सुतोवाच करत थेट एकप्रकारे इशारा दिला आहे.
आम्हीच त्यांना खासदार केलं आहे. पण आता आगामी काळात रायगड लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा असेल आणि या लढाईसाठी एक नाही तर चार जण तयार आहेत. ही लढाई आम्ही नक्की जिंकू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. याच वेळी त्यांनी, "तटकरे कुटुंबाला येणाऱ्या काळात मोठा झटका मिळेल," असा घणाघाती इशाराही दळवींनी दिला आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वाद मिटण्याऐवजी पुन्हा एकदा यात ठिणगी पडेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्यात त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. शिवसैनिकांकडून जल्लोष केला जात आहे. तसेच तटकरे यांच्यावर देखील जोरदार टीका शिवसेना नेते करताना दिसत आहेत. यावरून अलिबाग येथील पत्रकार परिषदेत भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्यासाठी माझादेखील पुढाकार होता, असे वक्तव्य तटकरे यांनी केले होते.
या वक्तव्याचा अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तटकरेंनी उगाच पालकमंत्रीपदाबाबत श्रेय घेऊ नये, उलट त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. खासदार महोदयांचा दावा हा अधांतरी असून, गेले दीड ते पावणे दोन वर्षे त्यांच्यामुळेच जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळाले नाही. याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे आणि जनतेलाही सांगावे.
भरत गोगावले हे सर्वसामान्य जनतेतील कार्यकर्ते आणि नेते आहेत. ते पालकमंत्री झाले याचाच अधिक आनंद आहे. रायगडच्या जनतेनं शिवसेनेला सर्वाधिक जनाधार दिला. यामुळे तो आमचा अधिकार होता आणि तो आम्हाला मिळाला. या लढाईत आम्ही जिंकलो. ज्यामध्ये सर्व नेत्यांना याचे श्रेय आहे. यामुळे तटकरेंनी पालकमंत्रीपदाचे श्रेय घेऊ नये, आता त्यांनी रडून सांगू नये, आम्ही लढाई जिंकली आहे, असे दळवींनी सुनावले आहे.
तसेच, गोगावले यांच्या रूपाने आता रायगडच्या जनतेला पालकमंत्री मिळाला असून, विकासाला खऱ्या अर्थाने आता न्याय मिळेल, असाही दावा दळवींनी केला आहे. तर याआधी किती पालकमंत्री किती झाले? किती विकास झाला? काय झाला? हे माहित नाही. पण गोगावले हे सर्वसामान्यांतील कार्यकर्ता असल्याचेही ते म्हणाले.
पालकमंत्री झाल्यानंतर आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनी गोगावलेंना शुभेच्छा दिल्या, पण तटकरेंनी अद्याप शुभेच्छा दिलेल्या नाहीत, यावर प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना दळवींनी, आम्हाला त्यांच्या शुभेच्छांची अपेक्षा सुद्धा नाही. तर जनतेनं ज्यांना आदर दिला, त्यांना महायुतीच्या नेत्यांनीही आदर दिला आहे. यामुळे त्यांना कोणी शुभेच्छा दिल्या तरी, नाही दिल्या तरी काही फरक पडत नाही. आता रडून काहीही फायदा होणार नाही, आम्ही ही लढाई जिंकलो आहोत, असेही दळवींनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.