Mumbai News : महापालिकेच्या शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात अनधिकृत शाळांवर धडक कारवाईचा धडाका लावला आहे. या कारवाईत १६४ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ७७ शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, कोणतीही ठोस पूर्वतयारी न करता केलेली ही कारवाई शिक्षण विभागाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. तब्बल २६ हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षण विभागाने कारवाई केल्यानंतर शाळाबाह्य झालेल्या मुलांना इतर शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे कायद्यानुसार बंधनकारक असते. मात्र, आसपासच्या शाळांमध्ये जागाच उपलब्ध नसल्याने या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर यामुळे शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान आहे.
पालिका प्रशासन त्यांना आपल्या सीबीएसई शाळांमध्ये तसेच कुर्ला-गोवंडी भागातील अंजुमन आणि मदनी स्कूलमध्ये सामावून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, तेथेही जागा फुल झाल्याचे उघड झाल्याने या मुलांचे करायचे काय, असा सवाल निर्माण झाला आहे.
दरम्यान, १६४ शाळा बंद केल्यानंतर बाधित विद्यार्थ्यांचा नेमका आकडा किती, याचीदेखील माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. तसेच सध्या केवळ बैठकांवर बैठका होताना दिसत असून, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पण शिक्षण विभागाने एकूण १६४ शाळांवर कारवाई केली असून, तब्बल २६,००० विद्यार्थी बाधित झाल्याचा अंदाज आहे.
तसेच सर्वाधिक फटका एम पूर्व (गोवंडी) ला बसला असून, ६४ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे सुमारे १० हजार विद्यार्थी बाधित झाले आहेत. तसेच ५३ इंग्रजी माध्यम, १० उर्दू आणि एका हिंदी माध्यमाच्या शाळेचाही यात समावेश आहे. तसेच पी उत्तर विभागातील (मालवणी, अंबूजवाडी) १४ शाळादेखील बेकायदा ठरवण्यात आल्या आहेत.
मुख्याध्यापकांच्या नाकी नऊ!
शिक्षण विभागाने स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आता पालिकेच्या मुख्याध्यापकांना कामाला लावले आहे. मुख्याध्यापकांना स्वतःची शाळा सांभाळून या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे आणि त्यांचे प्रवेश निश्चित करणे, अशी दुहेरी कसरत करावी लागत आहे. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे.
कारवाईचा फटका विद्यार्थ्यांना!
अनधिकृत शाळांवर कारवाई करणे योग्य असले, तरीही २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाचा ठोस प्लॅन तयार न करता केलेली ही कारवाई म्हणजे प्रशासकीय नाकर्तेपणाचा कळस आहे, अशी टीका होत आहे. या विद्यार्थ्यांना वेळीच प्रवेश मिळाले नाहीत, तर हजारो मुले शिक्षण प्रवाहातून कायमची बाहेर फेकली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.