Narayan Rane
Narayan Rane sarkarnama
कोकण

`माझे नाव किती छोट्या अक्षरात छापले आहे, किती हा क्षूद्रपणा!`

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ‘‘चिपी विमानतळाचे (Chipi Airport) सर्व श्रेय भाजप व आमचे आहे. उद्‍घाटनासाठी पाहुणे म्हणून बोलावले आहेत. आपल्याकडे असलेल्या पदाप्रमाणे काहीतरी देऊन जा!,’’ असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मारला.

चिपी विमानतळाचे उद्‍घाटन शनिवारी (ता.९) होणार आहे. या निमित्ताने या विमानतळाच्या श्रेयावरून वाद पेटला आहे. याबाबत भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी चिपी निमानतळासाठी कोणी मेहनत घेतली आणि त्याचे श्रेय कोण घेत आहेत यावर भाष्य करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका दाखवत प्रोटोकाॅल पाळला नसल्याचा दावा करत आपले नाव छोट्या टाईपमध्ये छापल्याचे त्यांनी सांगितले.

‘‘चिपी विमानतळाच्या सर्व परवानग्या मी महसूलमंत्री असताना घेतल्या असे सांगून राणे म्हणाले की त्यावेळचे नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन विमानतळाची परवानगी घेतली. त्यानंतर २०१४ पर्यंत विमानतळाचे सर्व काम पूर्ण झाले, तरीही आम्हीच विमानतळाचे काम पूर्ण केले असे हे म्हणतात. यांचा म्हणजे शिवसेनेचा खोटारडेपणा मी उद्याच्या उद्‍घाटन कार्यक्रमात व्यासपीठावरून सांगणार आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे माझे या जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे,असे सांगून राणे म्हणाले की, या जिल्ह्यात मी वैद्यकीय महाविद्यालय आणले. मी एमआयडीसी आणली. मी जिल्ह्यासाठी करत असताना आज जे फिरतात ते कुठे होते?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

पाहुण्यासारखे राहा!


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, मी थेट बोलणारा माणूस आहे. नुसते पद असून उपयोग नाही. या माणसाची लायकी नाही. ही उद्‍घाटन पत्रिका छापली आहे, यात माझे नाव अत्यंत छोट्या अक्षरात प्रसिद्ध केले आहे. इतका कमीपणा करू नये. मुख्यमंत्री आहात. पाहुणे म्हणून येणार आहात तर पाहुण्यासारखे राहा. पाहुणचार करून पाठवू, असेही सांगायला ते विसरले नाहीत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे रोज नाव पेपरमध्ये येत आहे.त्यांचे गैरव्यवहार रोज बाहेर येत आहेत, असे सांगत विनायक राऊत यांच्यावरही राणे यांनी टीका केली.

‘सिंधुदुर्गाचा विकास मी केला’


सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची १९९० पासूनची माहिती देताना राणे म्हणाले की, मी १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मागास होता. या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी अभ्यास करून अहवाल देण्यास टाटा ग्रुपला सांगितले. त्यांनी ४८१ पानाचा अहवाल दिल्यानंतर मी पुढाकार घेतला. मी १९९९ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर ११० कोटींचे रस्ते केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित करण्यासाठी मी दिल्लीला चकरा मारल्या आहेत.

मागण्या पूर्ण झाल्यावरच विकासाची कामे
शिवसेनेचे नेते पदाधिकारी हे ठेकेदाराकडून चारचाक्या गाड्या घेतात. तसेच आणखी काही गोष्टींची मागणी करतात. त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यावरच रस्त्यांची, विकासाची कामे सुरू होतात. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. खासगीत सांगतो, असेही राणे यांनी पत्रकार परिषदेत म्‍हणाले.

``आता जी चिल्लर फिरते ना, जे आम्हीच केले. आम्हीच केले, असे सांगत त्यांना पर्यटन म्हणजे काय माहीत नव्हते, असाही टोला त्यांनी लगावला. रस्ते, पाणी, सोयीसुविधा मी केल्या. विनायक राऊत तेव्हा कुठे होते?

मोदी साहेबांनी सात वर्षात विकास कसा करावा हे दाखवून दिले. भाजप हे लोककल्याणासाठी आहे. कोणी छाप्यांमागे सूडबुद्धि आहे, हे बोलू दे. माझे उत्तर हेच आहे की ज्यांच्यावर आयटीची रेड होते त्यांना बोलायचा अधिकार नाही, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT