narayan rane manoj jarange patil  sarkarnama
कोकण

Narayan Rane Vs Manoj Jarange: ...म्हणून नारायण राणेंनी आपल्या मराठवाडा दौऱ्याची वेळ सांगतानाच जरांगेंचे आभारही मानले!

Deepak Kulkarni

Sindhudurg News:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली आरक्षणासाठीची लढाई अधिक टोकदार केली आहे. त्यांनी आता महायुती सरकारसह महाविकास आघाडीलाही धारेवर धरले आहे.त्यामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच जरांगे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री व भाजप खासदार नारायण राणे यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमकी झडत आहे.

एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत या दोन्ही नेत्यांमधला वाद टोकाला पोहचला आहे.यातच आता मराठवाड्यात जाऊन जरांगेंना आव्हान दिल्यानंतर आता नारायण राणेंनी (Narayan Rane) मराठवाडा दौऱ्याचा मुहूर्त सांगितली आहे. विशेष म्हणजे आता राणेंनी जरांगेंचे आभारही मानले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी (ता.9) कणकवलीत मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या मराठवाडा दौर्यावरही रोखठोक भाष्य केले. ते म्हणाले, आपण संसदेचं सुरू असलेलं अधिवेशन संपल्यानंतर लगेच मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच या दौऱ्यावेळी मनोज जरांगे जर माझं स्वागत करणार असेल तर मी त्याला धन्यवाद देतो असेही राणे यांनी यावेळी सांगितले.

या दौऱ्यात आपण मराठवाड्यात भाजपकडून सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच केंद्रातील मोदी सरकार आणि महायुती सरकारने जी विकास कामे केली ती लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. असा पुनरुच्चार देखील खासदार नारायण राणे यांनी कणकवलीत पत्रकारांशी बोलताना केला आहे.

नारायण राणेंनी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मराठवाड्याचा दौरा करत त्यांचा समाचार घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.त्यावर जरांगेंनीही मला धमकी देण्यासाठी नारायण राणेंना फडणवीसांनी सांगितलं का? असा खोचक सवाल करत प्रत्युत्तर दिलं होतं. ते जर मराठवाड्यात येणार असतील तर त्यांचं स्वागत करतो, असेही जरांगे म्हणाले होते.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला मराठा फॅक्टरचा मोठा फटका बसला होता. आठपैकी एकही जागा निवडून न आल्यामुळे शिंदे- फडणवीस-पवार सरकारने आता आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा एकदा फटका बसू नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

तसेच मराठवाड्यासह राज्यातील मराठा नेत्यांना आता कामाला लावले आहे. एकीकडे मनोज जरांगे यांची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे.या रॅलीमधून जरांगेंनी महायुती सरकारला जोरदार हल्ले चढवणे सुरुच ठेवले आहे.याचाच भाग म्हणून भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या नारायण राणेंना मराठवाड्याच्या दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या दौऱ्यातून जरांगेंचं आव्हान परतवून लावण्याचा भाजपचा इरादा असल्याचे लपून राहिलेलं नाही.

नारायण राणे हे त्यांच्या मराठवाड्याच्या दौऱ्यात मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत.त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि नारायण राणे यांच्यातला वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. यापूर्वीही अनेकदा खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) टीकेची झोड उठवली होती. तसेच जरांगे पाटलांनीही राणे पितापुत्रांवर तोंडसुख घेतले होते.एकीकडे आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद पेटला असतानाच आता नारायण राणे या वादात उडी घेणार असल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT