Sindhudurg News : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यभर खबळ उडाली होती. यामुळे राज्यभर मोठा गदारोळ झाला होता. तोच आता सिंधुदुर्गमधील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत असतानाच उबाठा गटाचे नेते वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांच्यांवर गंभीर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. नाईक यांनी आरोपी सिद्धेश शिरसाटसोबत असलेले फोटो पोस्ट करत सिद्धेशचा आका कोण असा सवाल केला होता. आता या आरोपांवर निलेश राणे यांनी पलटवार केला आहे. तर प्रकाश बिडवलकरची हत्या झाली तेव्हा आरोपी उबाठा गटातच होता असा दावा त्यांनी केला आहे.
सिद्धीविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याची दोन वर्षांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. बीड प्रकरणात ज्या पद्धतीने सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती. त्या पेक्षा वाईट आणि क्रूर पद्धतीने आरोपी सिद्धेश शिरसाट याने बिडवलकर यास मारहाण करत हत्या केली होती. यावरून आता आजी-माजी आमदारांमध्ये वार-पलटवार पाहायला मिळत आहे.
वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे आरोपी सिद्धेश शिरसाटसोबत असलेले फोटो, मारहाणीचा व्हिडिओ पोस्ट करत एकच खळबळ उडवून दिली. तसेच सिंधुदुर्गात, बीडपेक्षा अवस्था भयानक असून सिद्धेशचा आका कोण? असा सवाल केला होता. त्यावरून आरोपी सिद्धेश शिरसाट हा उबाठा गटा कार्यकर्ता होता. त्याचे वैभव नाईक यांच्याबरोबरचे असणारे फोटो आहेत. ते आपणही समाजापुढे समोर आणू असा पलटवार आमदार निलेश राणे यांनी केला.
निलेश राणे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करताना, "वैभव नाईक जिल्ह्याचे नाव खराब करत आहेत. आतापर्यंत त्यांनी तेच केलं आहे. हे प्रकरण दोन वर्षांपूर्वीचे असून त्यावेळी आरोपी ठाकरे गटाचा कार्यकर्ता होता. त्यामुळे आता मयत सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकरची बॉडी कुठे आहे हे वैभव नाईकांनीच सांगावे. मी आता शिवसेनेत आलो आहे. याच्याआधी मी भाजपमध्ये होतो. त्यामुळे असे आरोप करण्याआधी त्यांनी विचार करावा. काहीही विचार न करता बोलत राहणे हेच त्यांचे ते काम आहे.
वैभव नाईक यांना सध्या सगळीकडे राजकारण दिसत असून या प्रकरणातही राजकारण दिसत आहे. उद्या सिंधुदुर्गात गाडीखाली कुत्रा जरी मेला तरी त्यात राणेंना हात असल्याचा आरोप ते करतील. पण जिथे डोक्याचा विषय येतो तिथे त्यांचा विषय संपतो. आजपर्यंत ते हेच करत आले आहेत. यांच्याकडून जिल्ह्याची बदनामी सुरू असून ती त्यांनी थांबवावी.
तर आमच्यावर आरोप करा; पण जिल्ह्याचे नाव खराब करू नका! वैभव नाईक तुम्हाला आमच्या शुभेच्छा असून आता आयुष्यभर तुम्हाला फक्त आरोपच करायचे आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याची सेवा लोकप्रतिनिधी म्हणून आमदार, खासदार म्हणून आम्हीच काम करणार आहोत. तुम्हाला आता पुढची 25 वर्षे तरी परत संधी मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही नवीन आरोप शोधत राहा. दिवसभर तुम्ही याच शोधत असता की, राणे कुठे अडचणीत येतील. पण आम्हाला याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे वैभव नाईक तुम्ही जे करताय, त्यात एवढीच काळजी घ्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव कुठे खराब होणार नाही.
आमच्यावर कितीही टीका करा. पण एकनाथ शिंदे साहेबांना यात खेचू नका. आम्ही आमच्या नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही दहा वर्षे जिल्ह्याचे वाटोळे केले. आता जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर बोलणार असल्याचा इशाराही निलेश राणे यांनी यावेळी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.