Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी आता कंबर कसली आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आता नेतेही मैदानात उतरले आहेत. दरम्यान रत्नागिरीत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी, रत्नागिरीत भाजप हा एक नंबरचा पक्ष राहील, असे भाष्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गोठात खळबळ उडाली आहे. तर कोकणात दोन पक्ष, दोन भावांसह मंत्र्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची स्पर्धाच लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आले असून भाजप, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यांमध्ये तीन मंत्री पदे देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न महायुतीत करण्यात आला आहे. पण सध्या रत्नागिरीमध्ये महायुतीतील दोन पक्ष एकमेकांवर कुरघड्या करण्यात मग्न असल्याचे समोर येत आहे.
रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत हे पालकमंत्री असून शिवसेना वाढीसाठी ते प्रयत्न करत आहेत. ऑपरेशन टायगरमधून येथे त्यांनी मोठा राजकीय भूकंप घडवून आणले आहेत. त्यांच्या मदतीला निलेश राणे काम करत असून ते देखील शिंदे सेनेला बळ देण्यासाठी पक्ष प्रवेश घडवून आणत आहेत. तर ठाकरेंची सेना खिळखिळी करत आहेत. पण दुसरीकडे मात्र त्यांचे बंधू नितेश राणे 'भाजप'च जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष असेल अशी भीमगर्जना करताना दिसत आहेत.
नितेश राणे यांनी, भाजप कार्यकर्त्यांना रत्नागिरीमध्ये प्रत्येक क्षेत्रात स्थान मिळाले पाहिजे, त्यांना ताकद मिळाली पाहिजे, यासाठी आपण हा जिल्हा मागून घेतल्याचे म्हटलं आहे. यामुळे आता जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याला मोठा करण्यासाठी काम केलं जाईल. मग ते जिल्हा नियोजन पासून ते विशेष कार्यकारी पदापर्यंत प्रत्येक पदावर भाजपचा कार्यकर्ता बसवला जाईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
तर आता रत्नागिरीत भाजप संख्येने कमी आहे ही भावना कार्यकर्त्यांनी मनातून काढून टाकावी. जिल्ह्यात भाजपला एक नंबर बनवायचे असेल तर जिद्दीने काम करावे लागेल असेही त्यांनी म्हटले आहे
नितेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ व प्रामुख्याने जिल्ह्यातील हिंदू समाजासोबत उभ राहण्यासाठी आपण येथे आलोय. पक्ष म्हणून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीमध्ये भाजपला मोठं यश मिळणार आहे.
त्यासाठी कामात सातत्य ठेवायला हवं. तसे केल्याल भविष्यात रत्नागिरीमध्ये भाजप हा एक नंबरचा पक्ष राहील. एकच नंबरचा पक्ष झाल्यास आगामी स्थानिक असो किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये देखील भाजपच नंबर वन असेल असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. तर आता नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत पक्ष वाढवण्याची स्पर्धाच लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.