
Solapur, 11 April : महाविकास आघाडी सरकारच्या काळात नारायण राणेंना जेवत्या ताटावरून उठवून अटक करण्यात आली होती. ते व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये अजूनही असून त्याची परतफेड केल्यानंतरच मी तो डिलिट करेन, असे राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रतिक्रिया आली असून ‘सूड उगवण्याची महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. असं वक्तव्य कोणी करत असेल, तर वरिष्ठांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे,’ असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. एखाद्या मंत्र्यांनी केलेलं स्टेटमेंट हे ‘त्या’ सरकारची भूमिका आहे का हेही तपासलं पाहिजे, असा चिमटा शशिकांत शिंदेंनी सरकारला घेतला.
राणे साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करेन, त्याच दिवशी तो डिलीट करेन आणि तो क्षण जवळ आलेला आहे, असे विधान मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी केले होते.
त्यावर बोलताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, मंत्री जर अशा पद्धतीने धमक्या देत असतील, तर त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. त्यावेळी काय परिस्थिती होती? कोणत्या बेसवर कारवाई झाली, हेही पाहिले पाहिजे. सूड उगवण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. ती असू नये, असं आमचं मत आहे. जर असं वक्तव्य कोणी करत असेल तर वरिष्ठांनी त्यामध्ये लक्ष घातले पाहिजे.
नीतेश राणेंच्या विधानावर शशिकांत शिंदे म्हणाले, एखाद्या मंत्र्याने केलेलं स्टेटमेंट हे त्या सरकारची भूमिका आहे का, हे तपासले पाहिजे. मंत्र्याने शपथ घेतल्यावर वैयक्तिक द्वेष, राग बाजूला ठेवून राज्याचे हित पाहिले पाहिजे. सत्तेचा उपयोग करून मागच्या असलेल्या द्वेषातून राजकारण करण्यासाठी वापर करतोय, असा त्याचा अर्थ होतो.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावर हर्षवर्धन पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले मंत्र्यांच्या स्वभावावर सरकार चालत नाही. सरकार घटनेप्रमाणे चालवावे लागते. प्रत्येक सरकार समोर प्रश्न असतात. मात्र, हे प्रश्न जेव्हा पुढे येतात, तेव्हा जबाबदारीने त्यांना न्याय द्यावा लागतो.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हेच अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील, तर शेतकऱ्यांनी कुठे जायचे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. कृषिमंत्री हे शेतकऱ्यांचे प्रमुख आहेत, तेच जर असं बोलायला लागले तर आश्चर्य आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
उदयनराजे यांनी वाघ्या कुत्र्यासंदर्भात केलेल्या विधानावर हर्षवर्धन पाटील म्हणाले, मी कोणाचेही नाव घेणार नाही. मात्र, कोणीही उठतो आणि इतिहासाबद्दल बोलू लागतो. कोण म्हणतो शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. मात्र, इतिहासाचे प्रत्येकाने वाचन करावं आणि त्यानंतर बोलावे. इतिहासावर बोलण्यापेक्षा वर्तमानात काय चाललंय, यावर लक्ष दिले पाहिजे.
प्रत्येक जण आपापल्या सोयीने इतिहासाची वाक्य वापरली जातात. त्या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केले जाते. मात्र, यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आता बऱ्याच गोष्टीवर कंट्रोल आणायला सुरुवात केली आहे. इतिहासाबद्दल कोणी बोलावं, याबद्दल एक एसओपी तयार केली पाहिजे. इतिहासाचा अभ्यास नसताना जर कोणी एखादं स्टेटमेंट केलं तर त्यांना विचारले पाहिजे की, तुम्ही कशाच्या आधारावर हे बोलत आहात. याचे संदर्भ दाखवा. मात्र, कारण नसताना ज्यांनी कर्तृत्व करून इतिहास निर्माण केला, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.