Raigad Politics : कोकणातील रायगड जिल्ह्यात महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद सध्या कमी होताना दिसत आहेत. तर तिढा न सुटलेल्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे केले जात आहेत. अशातच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी नाराज असल्याची चर्चा असून ते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचेही आता समोर येत आहे. याबाबत चर्चांना उत आला असून आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या सर्व चर्चा आणि तर्क-वितर्कांवर आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण देत, नक्कीच आमदार दळवी नाराज आहेत. मात्र रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावलेच होतील, असा दावा केला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आले असून दीड वर्षांनंतरही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली असून, आता विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर तोडगा निघाल्याचे बोलले जात आहे. याबाबत शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे केले जात असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावर लवकरच तोडगा निघेल, असे म्हणत आपला दावा सोडला आहे.
यानंतर आता मंत्री भरत गोगावले हेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, असा दावा आमदार महेंद्र थोरवे आणि आमदार महेंद्र दळवी करताना दिसत आहेत. दरम्यान, गोगावले यांनीदेखील आपल्या नावावर पालकमंत्री म्हणून शिक्कामोर्तब पुढील काही दिवसांत होईल, असे म्हणत हा विषय संपल्यात जमा म्हटले आहे.
अशा या सर्व राजकीय घडामोडींमध्येच आमदार महेंद्र दळवींबाबत मोठा खुलासा आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. आमदार महेंद्र दळवी नाराज असून ते मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चेवर त्यांनी भाष्य केलं आहे. आमदार थोरवे यांनी आमदार दळवी नाराज असल्याची कबुली टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे.
यावेळी ते म्हणाले की, दळवींची नाराजी योग्यच असून या आधी जिल्हा परिषद आणि आता विधान परिषद निवडणुकीवेळी झालेल्या घडामोडींमुळे ते दुखावले आहेत. जिल्हा परिषदेत त्यांच्या पत्नीला अध्यक्षपदाची संधी द्यायची ठरले होते. मात्र, महायुतीतील मतभेदांमुळे ते शक्य झाले नाही. उलट कमी सदस्यसंख्या असतानाही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला. त्यामुळे ते दुखावले आणि भूमिका घेतली. त्यांची ती भूमिका त्यांच्या जागी योग्यच आहे.
तर पुढे विधान परिषदेची निवडणूक लागली आणि त्यांच्या मुलीने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना थेट सूचना देत आदेश दिले. ज्यानंतर दळवींनी पक्षाचा आदेश पाळून मुलीचा अर्ज मागे घेतला, असे स्पष्टीकरण थोरवे यांनी दळवींच्या नाराजीबाबत दिले आहे.
तसेच, दळवी मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याच्या चर्चेवर थोरवे म्हणाले की, भरत गोगावले अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करत असून, त्यांच्या रूपाने रायगड जिल्ह्यातील शिवसेनेला सक्षम नेतृत्व मिळाले आहे. लवकरच त्यांची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घोषणा होईल, ही आनंदाची बाब आहे. सध्या ते मंत्री असून पुढे पालकमंत्री होतील. त्यांच्या माध्यमातून रायगडचा जास्तीत जास्त विकास करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. मंत्रिपदाचा मुद्दा मात्र पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या अधिकारक्षेत्रात असून ते जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असेही थोरवे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.