BJP Rajya Sabha Candidates sarkarnama
कोकण

Rajya Sabha Candidates : राज्यसभेसाठी भाजपमध्येच जोरदार रस्सीखेच, दिग्गजांच्या गर्दीत कोकणातील खासदार पुन्हा रेसमध्ये

mahavikas aghadi Vs mahayuti : महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी ७ जागांसाठी निवडणूक होत असून यात महायुतीच्या ६ जागा आणि महाविकास आघाडीला १ जागा जाणार आहे.

Aslam Shanedivan

  1. महाविकाआघाडी आणि महायुती यांच्यातील सात दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपत असून १६ मार्चला राज्यसभा निवडणूक होणार आहे.

  2. शरद पवार यांच्या नावावर महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

  3. भाजपकडून धैर्यशील पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची चर्चा असून पक्षांतर्गत रस्सीखेच वाढली आहे.

Raigad News : वसंत जाधव

राज्यसभेतील महाविकाआघाडी आणि महायुतीच्या ७ दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपणार असून १६ मार्चला निवडणुका होणार आहेत. यानिवडणूकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरु असून महाविकास आघाडीकडून जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावर जवळपास शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून ४ आणि शिवसेनेकडून ३ नावे निश्चित करण्यात आली असतानाच कोकणातील आणखी एक नाव समोर येत आहे. भाजपकडून खासदार धैर्यशील पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे राज्यसभेसाठी भाजपमध्येच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

राज्यसभेतील सात जागांच्या निवडणुकांची घोषणा झाली असून भाजपच्या उमेदवारांची नावं ठरल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी (ता.२४) रात्री कोअर कमिटीच्या बैठकीत या नावांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह १२ प्रमुख नेत्यांनी बैठक घेत यावर चर्चा केली आहे. तर भाजपकडून तब्बल १० ते १२ जणांच्या नावावर चर्चा करण्यात आलीय.

राज्यसभेच्या निवडणुकीवरून सर्वच पक्षात उत्सुकता शिगेला पोहचली असताना खासदारकीची माळ कोणत्या नेत्यांच्या गळ्यात पडणार? यावर खमंग चर्चा होताना दिसत आहे. अशातच रायगड जिल्ह्यातील भाजपचे खासदार धैर्यशील पाटलांचेही चर्चेत नाव आहे. नुकताच पार पडलेल्या नगर पालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा-पंचायत समित्या आणि महानगर पालिकेंच्या निवडणुकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी जिल्ह्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात मोठी झेप घेतली होती. यानंतरच आता राज्यसभेवर पुन्हा एकदा त्यांना पाठवण्याची चर्चा पक्ष पातळीवर होताना दिसत आहे.

दरम्यान जिल्ह्यात सध्याच्या घडीला सुरू असलेला राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वादात भाजपने न पडता आपली बाजू सेफ केली आहे. यात निर्णायक भूमिकेत खासदार धैर्यशील पाटील दिसत असून त्यांच्या युतीच्या घोषणेनंतरच आता जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पद भाजपकडे येण्याची शक्यता आहे.

भाजपचे‘मिशन कोकणा’ला वेग

केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपने देशभर मिशन कमळ आखले. ज्यानंतर राज्यात देखील ‘मिशन कोकण’ला वेग देण्यात आला. 2014 मध्ये प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार कमळ फुलवीले. ज्यानंतर येथील पेण, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असून पोट निवडणुकीतही धैर्यशील पाटील यांनी विजय मिळवत जिल्ह्यात भाजप भक्कम केली आहे. नुकताच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे चित्र स्पष्ट झाले असून जिल्ह्यात भक्कम असणाऱ्या काँग्रेससह शेकापचा सुपडा साफ झाला आहे. तसेच ठाकरेंची शिवसेना देखील लयास गेली आहे. येथे भाजपने आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

राजकीय समीकरण

तसेच येथे राजकीय समीकरण बदलली असून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. महायुतीत एकत्र असणारे पक्ष येथे एकमेकाची ताकद कमी करण्यावर भर देत आहेत. यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडे लोक जाताना दिसत आहेत. यातच एकमेकांचे राजकीय दुश्मन असलेले पेणचे दोन राजकीय नेते एकत्र भारतीय जनता पार्टी मधे सहभागी असल्याने पेणची ताकद वाढली आहे.

टर्म वाढवणे

दोन वर्षांपूर्वी त्यांनी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपने राज्यसभा दिली होती. पण आता त्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामुळेच त्यांना पूर्ण कार्यकाळ मिळावा हा एक हेतू आहे.

कोणाचा संपणार कार्यकाळ?

महाराष्ट्रातील राज्यसभेतील ७ खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. ज्यात शरद पवार, डॉ. भागवत कराड, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे.

तटकरेंना आव्हान

रायगडची जागा ही राष्ट्रवादीकडे असून येथे सुनील तटकरे हे खासदार आहेत. तटकरेंनी याच्याआधीच आपले सर्व विरोधक संपवले आहे. मात्र भाजपने महायुतीतील सध्याचे वाद पाहता भविष्यातील गणितांकडे लक्ष दिले आहे. येथे युतीतील बिघाड झाल्यास तटकरेंच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार म्हणून धैर्यशील पाटलांकडे पाहिले जात आहे. वडील मंत्री, स्वत: दोनदा आमदार आणि आता दोन वर्ष खासदार असल्यानेच ते येथे प्रमुख दावेदार ठरत आहेत. तसेच त्यांना प्रवेश देताना भाजपने पुन्हा राज्यसभेवर पाठवू असाही शब्द दिला असावा अशी ही कुजबूज आहे.

रायगडमध्ये शिवसेना वाढली

सध्याच्या स्थितीत शिवसेना भक्कम दिसत असून नुकताच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे. येथे शिवसेनेचे २१ जिपचे सदस्य निवडून आले आहेत. तर येथे भाजपचे १५ सदस्य निवडून आले असून ८ पनवेलमधल आहेत. यामुळे जिल्ह्यात कमी झालेली ताकद वाढविण्यासाठी देखील धैर्यशील पाटलांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.

FAQs :

1. राज्यसभा निवडणूक कधी होणार आहे?
१६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

2. कोणत्या आघाड्यांमध्ये मुख्य लढत आहे?
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे.

3. शरद पवार यांची भूमिका काय असू शकते?
महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावावर जवळपास अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

4. भाजपकडून किती उमेदवार निश्चित झाले आहेत?
भाजपकडून चार नावे निश्चित झाल्याची माहिती आहे.

5. धैर्यशील पाटील यांच्याबाबत काय चर्चा आहे?
त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेसाठी संधी मिळू शकते, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT