sarkarnama
sarkarnama
कोकण

Ramdas Kadam News : 'महायुती असतानाही भाजपाकडून योगेश कदम यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे प्रयत्न' ; रामदास कदमांचा गंभीर आरोप!

सरकारनामा ब्यूरो

Dapoli Constituency News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमध्ये जागा वाटपावरून ओढाताण सुरू असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दापोली येथे झालेल्या जाहीर सभेत पुन्हा एकदा रामदास कदम यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

दापोली मतदारसंघात आमदार योगेश कदम यांना त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्याकडून संपवण्याचे प्रयत्न झाले आणि आज महायुती असताना देखील इथल्या स्थानिक भाजपाकडून देखील हा प्रयत्न चालू आहे. असा मोठा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. शिंदे साहेब महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांना सांगा अशी थेट मागणी रामदास कदम यांनी व्यासपीठावरूनच केली.

'कोण तो रवींद्र चव्हाण तो इथे दहा-पंधरा कोटींची कामे घेतो. कोण तो भाजपाचा आमदार संजय केळकर तो इथे येऊन भूमिपूजन करतो. आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून कोण तो गोव्याचा मुख्यमंत्री इथे दापोलीत येऊन शिवसेनेच्या लोकसभेच्या जागेवरती अधिकार सांगतो, हक्क सांगतो. अरे हे तुमचं चाललंय काय?' अशा शब्दात रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'होय शिंदे साहेब आपले 40 आमदार असताना त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं पण जहाल शिवसेनेला 40 आमदार 13 खासदार आणि 10 दहा अपक्ष घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासारख्या गद्दाराला धडा शिकवण्याचं काम हे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात. बाकी कुणाची ताकद नव्हती.' अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचाही जोरदार समाचार घेतला. 'ज्या वेळेला कोकणावरती नैसर्गिक संकट आली वादळ आलं तेव्हा कोकणातला सगळा मच्छीमार संपला होता. देशोधडीला लागला होता. सगळ्यांची घरं उध्वस्त झाली होती त्यावेळेला शरद पवार यांच्यासारखे 82 वयाचे जेष्ठ नेते कोकणात येऊन चार दिवस बसले होते.

आमदार योगेश कदम यांनीही रात्रंदिवस काम केलं त्यावेळेला अजित दादांनीही योगेश कदमला मदत केली पण हा उद्धव ठाकरे आणि त्याचे पिल्लू हे दोघेही इथे बघायला आले नाहीत. कोकणातल्या मच्छीमारांचे अश्रू पुसण्यासाठी या उद्धव ठाकरेला वेळ मिळाला नाही.' अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

याशिवाय 'आता हाच उद्धव ठाकरे सगळ्या ठिकाणी सभा घेतोय पळतोय पण आता उद्धव ठाकरेला पळायला एकनाथ शिंदे तुम्हीच लावलेत, शिंदे साहेब तुम्हीच त्याला मातोश्रीतून बाहेर काढले अडीच वर्षे मुख्यमंत्री होता पण केवळ दोन वेळा मंत्रालयात आला.' अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT