Ratnagiri ZP reservation Bhaskar Jadhav And Ramdas Kadam  sarkarnama
कोकण

Ratnagiri ZP reservation : 'मिनी मंत्रालया'च्या आरक्षणात उलथापालथ! रामदास कदमांच्या बंधूंना धक्का, भास्कर जाधवांच्या मुलाला दिलासा!

Ramdas Kadam And Bhaskar Jadhav In Ratnagiri ZP Election : आज काढण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या 56 गटांची आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज माजी सदस्यांना दिलासा मिळाला आहे. तर काहींना जोरदार फटका बसल्याचे समोर आले आहे.

Aslam Shanedivan

  1. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटांच्या आरक्षण सोडतीत 18 गट महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.

  2. फेरआरक्षणामुळे माजी मंत्री रामदास कदम यांच्या बंधूंना धक्का बसला आहे.

  3. तर भास्कर जाधव यांच्या मुलाला या सोडतीत मोठा दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी : आज प्रसिद्ध झालेल्या जिल्हा परिषदेच्या 56 गटांच्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जाती-जमातीसाठी हर्णै हा 1 गट आरक्षित राहिला. तर अनुसूचित जमातीसाठी 2, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी महिलांसाठी 8 गट, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 7, सर्वसाधारण महिलांसाठी 18 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 20 गटांत आरक्षण पडले आहे. या आरक्षणामुळे काही दिग्गज माजी सदस्यांना दिलासा मिळाला असून काहींना आरक्षण बदलल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. महिलांसाठी एकूण 28 गट आरक्षित झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी ही सोडत काढली. पूर्वीच्या आरक्षणांचा विचार करून रोटेशन पद्धतीने फेरआरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी हर्णै हा गट आरक्षित झाला असून अनुसूचित जातीसाठी 2 आरक्षण काढण्यात आले आहेत. यात हातखंबा आणि वाटद गटाचा समावेश होते.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी 8 गटांचे आरक्षण झाले असून यात लोटे, दाभोळ, कोंडकारूळ, शिरगाव (चिपळूण), भरणे, अलोरे, विराचीवाडी, पालगड हे आठ गट आहेत. सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 7 जागांसाठी आरक्षण काढले असून त्यात पडवे, शृंगारतळी, नाचणे, भडगाव, कर्ला, जुवाटी आणि तिवराडचा समावेश आहे.

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 18 जागा आरक्षित करण्यात आल्या. ज्यात कळवंडे, पेढे, धामणदेवी, साठवली, खेडशी, आसगे, वहाळ, खेर्डी, कसवा, भांबेड, मुचरी, साखरीनाटे, कातळी, साडवली, सावर्डे, झाडगाव, वेळणेश्वर, तळवडे गटांचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 20 गटांचे आरक्षण सोडले. यात केळशी, कोतवडे, उमरोली, खालगाव, जालगाव, बाणकोट, कोळबांद्रे, भिंगळोली, कोसुंब, कडवई, गोळप, धामापूर, वडदहसोळ, धोपेश्वर, दयाळ, कोकरे, असगोली, दाभोळे, गवाणे, पावस या गटांचा समावेश आहे.

काहींचा सभागृहातच जल्लोष

अनेक गटांचे आरक्षण बदलल्याने जुन्या आणि मातब्बरांचा हिरमोड झाला आहे; परंतु सभागृहात आलेल्या अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या गटाचे आरक्षण सुरक्षित राहिल्याने सभागृहातच सहकाऱ्यांना आवाज देऊन आनंद व्यक्त केला.

रत्नागिरीत मातब्बरांना लॉटरी

जिल्हा परिषद गटाच्या आरक्षण सोडतीनंतर एकूण 56 पैकी 28 गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मातब्बर माजी नेत्यांना आरक्षण कायम राहिल्याने लॉटरी लागली आहे. तर आण्णा कदम, विनोद झगडे, बाबू म्हाप यांना आरक्षण बदलल्यामुळे मोठा फटका बसला. या तिघांना आता अन्य मतदार संघ शोधण्याची वेळ आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. आरक्षण सोडतीनंतर अनेकांना धक्का बसला आहे. त्यात माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू व माजी बांधकाम सभापती आण्णा कदम यांचा समावेश आहे. त्यांचा भडगाव नागरी मागास प्रवर्ग (नामाप्र) साठी हा गट आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना आता दुसरा गट शोधावा लागणार आहे. खेडमध्ये फक्त दयाळ हाच गट सर्वसाधारणसाठी राखीव आहे.

चिपळूणमध्ये माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विनोद झगडे यांना फटका बसला. त्यांचा अलोरे हा महिला राखीव झाला. त्यांनासुद्धा दुसरा गट शोधावा लागणार आहे. रत्नागिरीमध्ये शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख व माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती बाबू म्हाप यांचा शिरगाव हा गट महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यांनासुद्धा दुसऱ्या गटाचा आधार घ्यावा लागणार आहे.

संगमेश्वर तालुक्यातील मातब्बरांना मात्र त्यांच्या मनासारखेच आरक्षण पडले आहे. यामध्ये माजी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने यांचा कोसुंब गट, माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांचा कडवई, शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांचा धामापूरतर्फे संगमेश्वर, शिक्षण सभापती विलास चाळके यांचा दाभोळे हे गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक यांचा कसबा हा सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित झाला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचासुद्धा असगोली हा गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. माजी सदस्य नेत्रा ठाकूर यांचा वेळणेश्वर हा गट सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाला आहे.

नाचणे नामाप्रसाठी आरक्षित

रत्नागिरीमध्ये नाचणे हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाला आहे. याचा फायदा माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांना होणार आहे. त्याचबरोबर भाजपचे सतीश शेवडे यांचा कोतवडे हा गट सर्वसाधारणसाठी आरक्षित झाला आहे. माजी उपाध्यक्ष उदय बने यांना मात्र त्यांचा जुना गट असलेला गोळपचा आधार घ्यावा लागणार आहे. लांज्यामध्ये स्वरूपा साळवी यांचा गवाणे गट हा सर्वसाधारणसाठी राखीव झाला आहे.

FAQs :

प्र.१: रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या किती गटांमध्ये महिला आरक्षण झाले आहे?
👉 एकूण १८ गट महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

प्र.२: फेरआरक्षणाचा फटका कोणाला बसला आहे?
👉 माजी मंत्री रामदास कदम यांच्या बंधूंना या फेरआरक्षणाचा धक्का बसला आहे.

प्र.३: कोणाला या आरक्षणाचा फायदा झाला आहे?
👉 शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाला या आरक्षणामुळे दिलासा मिळाला आहे.

प्र.४: या आरक्षणामुळे राजकीय समीकरणात काय बदल होणार?
👉 स्थानिक पातळीवर महिला नेतृत्वाचा प्रभाव वाढणार असून काही जुन्या नेत्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे.

प्र.५: या सोडतीचा रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी निवडणुकीवर काय परिणाम होईल?
👉 महिला आरक्षण वाढल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल आणि राजकीय स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT