Sunil Tatkare, Ajit pawar
Sunil Tatkare, Ajit pawar Sarkarnama
कोकण

'' राज्यात पवारांनी आघाडीचं सरकार आणलं अन् तटकरेंच्या मनात 'ही' भावना आली...''; अजितदादांची कोपरखळी

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar On Sunil Tatkare News : आपल्या सर्वांची बारकाईने माहिती जर कुणाला माहिती असेल तर ती आपल्या ड्रायव्हरला असते. जी माहिती आपल्या घरच्यांनाही नसते ती ड्रायव्हरला असते. बाबा कुठं गेला, कुठं थांबला,किती वेळ थांबला, रुम कशा बदलल्या, कुठल्या रुममध्ये शिरला आणि कुठल्या रुममधून बाहेर पडला अशी माहिती ड्रायव्हरला असते अशी चौफेर टोलेबाजी करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. यावेळी अजितदादांनी आपल्या भाषणातून तटकरे यांच्याबद्दल कधी कौतुकोद्गार काढले तरी कोपरखळी लगावली.

पवार म्हणाले, तटकरे यांचे वडील ज्यावेळी दौर्यावर जात असत. त्यावेळी त्यांची गाडी चालविण्याची जबाबदारी ही सुनील तटकरे यांच्यावर असायची. त्यावेळी ते फक्त गाडीच चालवत नसत तर बारकाईने राजकारणावरील गप्पागोष्टी एेकत असत. पण सातत्याने राजकारणासंबंधी गोष्टी, विचार कानावर पडल्यामुळे ते चांगले तयार झाले. आणि असं म्हणतात की, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. त्यांच्या याच सवयीची तटकरे यांना पुढील कामात मदत होत आली आहे.

ते दिल्लीला असले तरी रायगडमध्ये काय चाललंय, रोह्याला काय चाललंय, राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यालयात काय चाललंय अशी सर्व माहिती त्यांना असते. आणि ते माहिती असलंही पाहिजे. त्यामुळे पुढील निर्णय घ्यायला सोपं जातं असेही पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार म्हणाले, सुनील तटकरे जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदारकीनंतर खासदार म्हणून दिल्लीत काम करत आहे. पण २०१९ साली पवार साहेबांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचं सरकार आणलं तेव्हा तटकरे यांच्या मनात एक भावना आली की, जर मी खासदार झालो नसतो दिल्लीला गेलो नसतो आणि आमदार होऊन महाराष्ट्रातच राहिलो असतो मंत्री झालो असतो अशी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला.

मात्र, २०१४ सालच्या लोकसभेत तटकरेंना निसटता पराभव स्विकारावा लागला. त्यावेळी नऊ उमेदवार सुनील तटकरे नावाचे होते. याचाही फटका त्या निवडणुकीत त्यांना बसला. मात्र, त्यांनी या अपयशानंतर खचून न जाता, मागे वळून न पाहता २०१९ लोकसभेसाठी जिद्द, चिकाटीनं तयारी केली. आणि त्या निवडणुकीत ३१ हजार ५०० मतांनी यश मिळवत मागील पराभवाची भरपाई भरुन काढली. आणि हा विजय भास्करराव जाधव पाठीशी उभं राहिल्याशिवाय शक्यच नव्हता असाही चिमटा पवार यांनी यावेळी काढला.

अलिकडचा अपवाद वगळता कोकणातून सातत्याने चांगले, अभ्यासू, विद्वान लोकप्रतिनिधी दिले आहेत. यात सीडी देशमुख, बँरिस्टर अंतुले,सुरेश प्रभू, मधू दंडवते, नाथ पै, यांच्यासारख्यांचा समावेश आहे. या सर्व नेतेमंडळींनी महाराष्ट्राचा गौरव दिल्लीत वाढविला. तेच काम सुनील तटकरे करत आहेत. आता मुंबई गोवा महामार्गाचं गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले काम तटकरे यांनी मार्गी लावावं अशी मागणी देखील पवारांनी या कार्यक्रमात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT