Jayant Patil-Mahendra Dalvi Sarkarnama
कोकण

Mahendra Dalvi VS Jayant Patil : जयंत पाटलांना शिंदे गटाचा खोचक सल्ला; ‘शेकाप आता कुठल्या तरी राष्ट्रीय पक्षात विलिन करावा’

Vijaykumar Dudhale

Raigad, 18 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांंनी जयंत पाटील यांना खोचक सल्ला दिला आहे. ‘जयंत पाटील यांनी आता शेतकरी कामगार पक्ष कुठल्या तरी एखाद्या राष्ट्रीय पक्षात समाविष्ठ करावा. कारण, शेकापकडे आता जनाधार राहिलेला नाही. दिवा विझताना जसा फडफड करतो, तशी जयंत पाटलांची अवस्था आहे,’ अशा शब्दांत महेंद्र दळवी यांनी टीका केली.

आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाची (PWP) आजची अवस्था ही जनाधार हरवलेला पक्ष, अशी झालेली आहे. या पक्षाचे प्रमुख नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडीसोबत जावं की आणखी कोणासोबत हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. विधान परिषदेतील पराभवानंतर त्यांनी जे भाष्य केले आहे. त्यातून ते कोणावरच विश्वास ठेवत नसल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाचेही मत फुटले, असा दावा त्यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी आता शेकाप हा एखाद्या राष्ट्रीय पक्षात समाविष्ठ करावा. कारण, शेकापकडे आता जनतेचा पाठिंबा राहिलेला नाही. शेकापकडे आता कुठलीच सत्ता राहिलेली नाही, त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहतील, असं मला वाटत नाही. शेकापचे कार्यकर्ते इतर पक्षात गेलेले नक्कीच पहायला मिळतील. कारण नेत्यांनी विश्वासर्हता गमावलेली आहे. त्यामुळे शेकाप भविष्यात उभारी घेईल, असं मला वाटत नाही, असेही आमदार दळवी यांनी सांगून टाकले.

जयंत पाटील यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत जवळीक आहे, असे तुम्ही म्हणता, त्यामुळे जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. दुसऱ्या कुठल्या पक्षात ते ॲडजेस्ट होणार नाहीत. जयंत पाटील यांचा स्वभाव पाहता, त्यांचं कोणाशीच जमणार नाही, हे निश्चित आहे. जयंत पाटील स्वयंभू नेते आहे, त्यामुळे त्यांच्याबाबत आपण काय बोलायचे, असा सवालही त्यांनी केला.

आमदार दळवी म्हणाले, रायगड जिल्ह्यातील शेकापची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत विधान परिषद निवडणुकीत हरल्यानंतर त्यांनी मेळावा घेऊन शेकापला उभारी देण्याचे काम केले आहे. पण, गेल्या पंधरा वर्षांत जयंत पाटील यांनी आपल्या कुटुंबाच्या बाहेर सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे कधी बघितलचं नाही. त्यामुळे असंख्य कार्यकर्ते शेकापतून बाहेर पडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT