Operation Tiger Maharashtra : कोकणात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. दोन्ही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आले आहेत. दोघांही नेत्यांची पक्ष देखील कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे दोघे प्रतिस्पर्धी एकत्र आल्याने, कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते भास्कर जाधव चिपळूणमध्ये एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा 'आॅपरेशन टायगर'च्या चर्चा केल्या जात आहेत. यातच दोन्ही बाजूने कोणताही प्रतिक्रिया न आल्याने, या भेटीविषयी आगामी राजकीय तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहे.
चिपळूणचे दिवंगत माजी आमदार आणि ज्येष्ठ संपादक निशिकांत तथा नाना जोशी यांच्या स्मृतींना अभिवादन करत पॉवर हाऊस ते चिंचनाका या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमानिमित्ताने एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) नेते आमदार भास्कर जाधव हे एकत्र आले होते.
विशेष म्हणजे, (कै.) निशिकांत जोशी यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीमुळे कोकणातील (Konkan) राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांबाबतही तर्क-वितर्कांना सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, दोघा नेत्यांनी एकमेकांच्या शेजारी बसून, नाश्ता केला. दोघांमध्ये काही मुद्यांवरून गप्पा देखील रंगल्या होत्या. या गप्पांचा आता राजकीय अर्थ लावला जाऊ लागला आहे.
भास्कर जाधव हे ठाकरेंसोबत जरी असले, तरी पक्षात काहीसे नाराज आहे. मध्यतंरी त्यांच्या कार्यालयात भाजप मंत्री येऊन गेले. विधिमंडळात ते विरोधी पक्षनेते पदासाठी आक्रमक आहेत. भाजपकडून यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. पक्षाकडून राज्य पातळीवर स्थान मिळत नाही. अशा चर्चा असल्या तरी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे आणि जाधव एकत्रितपणे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले होते.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी, स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. मध्यतंरी एकनाथ शिंदे शिवसेना फुटणार असल्याच्या चर्चांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर होते. परंतु त्यांनीच समोर येत, चर्चांना पूर्णविराम दिला. आता राज्यात आॅपरेशन टायगरच्या चर्चांना एकनाथ शिंदे शिवसेनेकडून हवा दिली जात आहे. यात उदय सामंत यांची निर्णायक भूमिका राहिली आहे. पुढेही त्यांची भूमिका महत्त्वाची असणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण पक्षचिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यात ठाकरेंकडून कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादामुळे अनेक चर्चांना पुन्हा तोंड फुटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या चुकीच्या निर्णयावर कायदेशीर बाजू मांडण्यात ठाकरेंकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. यावरून शिवसेना ठाकरेंकडून एकनाथ शिंदे शिवसेनेला डिवचले जात आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यावर भाष्य करावे लागले आहे.
हा सत्तासंघर्ष सुरू असतानाच, प्रतिस्पर्धी पक्ष आणि त्यातील दोघा नेत्यांचे निमित्ताने एकत्र आल्याने चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. यातून तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. या भेटीचा आगामी काळात राजकीय पडसाद कितपत उमटतात याकडे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.