जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धूरा भास्कर जाधवांकडे देण्याची घोषणा करण्यात आली.
या घोषणेमुळे कोकणातील वाद संपल्याची चर्चा सुरू झाली होती.
मात्र भास्कर जाधव यांनी जबाबदाऱ्यांचे असमान वाटप आणि ताकद न दिल्याबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.
Kokan Political News : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची चिपळुणची जबाबदारी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे दिली जाईल, त्याच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढवली जाईल, असे ठाम निर्देश पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या जाधव–राऊत अंतर्गत वादावर तूर्तास पडदा पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र आता हा वाद काही शांत होणाराल दिसत नसून भास्कर जाधव नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव हे मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखे जातात. पण आता तेच पक्षावर पुन्हा नाराज झाल्याचे चित्र आहे. नुकताच त्यांच्याकडे माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिपळुणची जबाबदारी दिल्याची घोषणा केली होती.
आता हीच घोषणा वादाला फोडणी देणारी ठरली असून भास्कर जाधव नाराज झाले आहेत. त्यांनी, मला माझ्या तालुक्यापुरते विचारा... मला ते माहित आहे. जिल्ह्याचे नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी पक्षाकडून जबाबदाऱ्यांचे असमान होणाऱ्या वाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पक्षाकडून अशा गोष्टीला ताकद दिली जात नसल्याचे देखील त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे.
भास्कर जाधवांचा कानाडोळा?
पत्रकारांनी जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न केल्यानंतर भास्कर जाधवांनी, मला जिल्ह्याचे माहित नाही, माझ्या मतदार संघातलं विचाराल तर तीनही पंचायत समिती मी जिंकणार, असे विधान केलं आहे. त्यांच्या विधानानंतरच आता शिवसेनेतील वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री राहिलेल्या भास्कर जाधव यांनी आपला संपूर्ण फोकस केवळ मतदारसंघातील निवडणुकांवर केल्याचे कळत आहे. तर राऊत यांच्याशी असणाऱ्या वादामुळे ते जिल्ह्यातील निवडणुकांकडे कानाडोळा करत असल्याची आता चर्चा रंगली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून भास्कर जाधव माध्यमांपासून दूर आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिवरही भाष्य करणे टाळत आहेत. पण आज जेव्हा त्यांना छेडण्यात आले, यावेळी त्यांनी, त्यांच्या मतदार संघावर फोकस असल्याचे सांगत मुद्दा बाजुला सारला आहे. तसेच त्यांनी, भाजपकडून आतापर्यंत पक्ष फोडून झाले, मतदार याद्यात घोळ सुरू आहेत.
भरमसाठ पैशांचा वापर करून निवडणुका जिंकण्याचा त्यांचा फंडा आहे. भाजप ज्यांच्याशी मैत्री करते आधी त्यांना संपवते, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा जीव चोचीत अडकला आहे. मात्र त्याउलट आमच्याकडे पैसे नाहीत, प्रचंड जनशक्ती आहे. धनशक्तीसमोर जनशक्ती भारी पडेल असा मला विश्वास आहे. माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समिती मी जिंकणार, असे वक्तव्य गुहागरमधील १५ उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यानंतर केलं आहे.
भावनिक साद...
यावेळी भास्कर जाधव यांनी सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली असून मला उभं राहायला अजून चार वर्षे शिल्लक आहेत, मी यांना ऐकणार नाही. गेली ती गंगा आणि राहिले ते तीर्थ, जे सोडून गेलेत त्यांनी पुन्हा माघारी यावं, आपण विकासाचा नवा हुंकार देऊ, असे म्हटलं आहे.
यादरम्यान चिपळुणातील अतिथी हॉटेलच्या सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आढावा बैठकीत माजी खासदार विनायक राऊत चिपळूणची जबाबदारी आमदार भास्कर जाधव यांना देण्यात येईल, त्यांच्याच नेतृत्वात त्या लढायच्या असे निर्देश दिले होते. पण आता पुन्हा एकदा त्यांच्यातील मतभेद समोर आले आहेत.
तर नगरपालिका निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या दोन स्वतंत्र गटाचा फटका पक्षाला बसला आहे. मात्र, आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखालीच लढवाव्यात, असा स्पष्ट आदेश कार्यकारणी बैठकीत देण्यात आल्याने आमदार भास्कर जाधव ही जबाबदारी घेतात का हे पाहावं लागणार आहे. पण आता त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
धनश्री शिंदे शिंदे गटात?
दरम्यान, चिपळूण तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणांसाठी उमेदवारांची निवड पूर्ण करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाकरे गटाच्या माजी पंचायत समिती सभापती धनश्री शिंदे या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा असली, तरी या विषयावर बैठकीत कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचेही स्पष्ट झाले.
1) भास्कर जाधव यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात आली आहे?
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धूरा त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
2) ही घोषणा कोणी केली?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी केली.
3) कोकणातील वाद संपल्याची चर्चा का झाली?
जाधवांकडे धूरा दिल्याने नेतृत्वावरून असलेला वाद संपल्याचे मानले जात होते.
4) भास्कर जाधव नाराज का असल्याचे सांगितले जाते?
जबाबदाऱ्यांचे असमान वाटप आणि पक्षाकडून अपेक्षित ताकद न मिळाल्याची अप्रत्यक्ष भावना त्यांनी व्यक्त केली.
5) याचा पक्षावर काय परिणाम होऊ शकतो?
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.