Barsu Refinary Protest
Barsu Refinary Protest Sarkarnama
कोकण

Barsu Refinery Project Protest: कोकणातील बारसू प्रकल्प आहे तरी काय? का होतोय ग्रामस्थांचा विरोध?

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri Barsu Refinery Movement: कोकणात सध्या रिफायनरी प्रकल्पावरून सुरू असलेला वाद पेटला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव या परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पावरून सध्या वाद सुरू आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष 'बारसू' प्रकल्पाकडे लागले आहे.

प्रस्तावित रिफायनरी जागेच्या सर्व्हेला स्थानिक सुरुवात झाल्याने, प्रशासन आणि ग्रामस्थांमधला संघर्ष वाढला आहे. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप करत, विरोधकांनी वातावरण तापवलं आहे. या संदर्भात पर्यावरणतज्ञ यांच्या सोबत बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पण हा रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे? यावरून राजकारण का होतंय? हे जाणून घेऊ...

बारसू रिफायनरी प्रकल्प काय आहे?

हा रिफायनरी प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पांपैकी एक आहे. बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग कंपनी प्रस्तावित आहे.तेल शुद्धीकरण क्षेत्रातील सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणारी करणारी मोठी कंपनी आहे. या आरामको कंपनीबरोबर केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन आणि इंडियन ऑइल या तीन कंपन्यांच्या सहाय्याने हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे 3 हजार एकर जागेवरती प्रस्तावित आहे. "आम्हाला आमच्या जमीनी प्रकल्पासाठी द्यायच्या नाहीये, आमच्या गावाचा विनाश होतांना आम्हाला पाहायचं नाही." असे विरोधकांचे म्हणणे आहे.

थोडक्यात हा प्रकल्प म्हणजे तेल शुद्धीकरण करणारा मोठा प्रकल्प आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू,गोवळ,धोपेश्वर तसेच नाटे या गावांच्या परिसरात नियोजित आहे.या रिफायनरीसाठी सोमवारपासून मातीचे परीक्षण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या रिफायनरीलाच विरोध असल्याने स्थानिकांनी या सर्वेक्षणाविरोधात कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली.

मातीचे सर्वेक्षण कशासाठी?

या प्रस्तावित प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. बारसू भागामध्ये औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी या भागातील जमीन योग्य आहे का नाही हे बघण्यासाठी भू- सर्वेक्षण करण्यात आले आहे.

रिफायनरी विरोधात आंदोलन का?

प्रस्तवित प्रकल्प जिथे होणार आहे. तेथे ग्रामस्थांच्या शेतजमिनी आहेत. जर या प्रकल्पाला जमीनी गेल्या तर तेथील जैवविविधतेवर त्यांचा परिणाम होईल तसेच पर्यावरणाचीही हाणी होईल. या प्रकल्पामुळे आंबा आणि मासेमारी हे दोन पोरंपारिक व्यवसाय संकटात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सागरी जैवविविधतेवरही परिणाम होईल अशी भीती रहिवाशांना आहे.कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले असून आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा टिकाव्यात ही स्थानिकांची भूमिका आहे.त्यामुळे रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे तेथील ग्रामस्थांनी नियोजित प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे.

शेतकऱ्याची किती जमीन या प्रकल्पासाठी जाणार?

राजापूर प्रस्तवित बारसू प्रकल्पासाठी लागणारी ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या ताब्यात आहे.या प्रकल्पासाठी कोकणातील सुमारे तीन हजार 400 एकर जमिनीवर क्रुड रिफायनरी प्रस्तावित आहे. क्रुड टर्मिनलसाठी 501 एकर जमीन लागणार आहे. या जमिनीच्या सर्वेक्षण चाचणीसाठी 84 कुपनलिका खोदाव्या लागणार आहेत.

Edited by : Rashmi Mane

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT