Chhagan Bhujbal, Ajit Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Jayant Patil News: भुजबळांना निवडणुकीचा अंदाज आलाय, तर अजित पवार..., भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil On NCP Ajit Pawar Group: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने येणार याचा नेहमी अंदाज असतो. भुजबळ हे नाराज असल्याचं ऐकून आहे. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) नाराज आहेत की आजारी आहेत हे माहिती नाही. तसेच या दोघांशीही माझा संपर्क नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. पाटलांच्या या वक्तव्यामुळे भुजबळ खरंच नाराज आहेत का? आणि असतील तर ते का नाराज आहेत? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यात सध्या लोकसभेच्या (Lok Sabha) पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरु आहे. सोमवारी 20 तारखेला राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला येणार आहे. तर निवडणुकीचा निकाल बघून काय निर्णय घ्यायचा यासाठी भाजपने बनविलेला गट प्रयत्न करेल, असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेत कांद्याच्या प्रश्नावर घोषणाबाजी करणाऱ्या किरण सानप याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावेली बोलताना ते म्हणाले, कांद्याचा प्रश्न 3 ते 4 जिल्ह्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. सानप याने तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच्या प्रश्नाला उत्तर मिळालं 'जय श्रीराम'. त्यामुळे शेतकऱ्यांकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे, हे महाराष्ट्राला कळालं आहे. असं म्हणत पाटील (Jayant Patil) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

भुजबळांना निवडणुकीचा अंदाज असतो

यावेळी बोलताना पाटील यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ते म्हणाले, 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल येईल, निकाल बघून काय निर्णय घ्यायचा यासाठी भाजपने बनविलेला गट प्रयत्न करेल. तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने येणार याचा नेहमी अंदाज असतो. अशातच भुजबळ हे नाराज आहेत हे ऐकून आहे. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) नाराज आहेत की आजारी आहेत हे पण माहिती नाही. मात्र, माझा या दोघांशीही संपर्क नसल्याचं पाटलांनी स्पष्ट केलं

पाटलांच्या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. 4 जूनला निर्णय पाहून अनेक नेते अजितदादांच्या गटातून शरद पवार (Sharad Pawar) गटात येणार असं अप्रत्यक्षरित्या पाटील यांनी म्हटलं आहे. शिवाय अनेकांना याबाबत शंका देखील आहे. कारण, नुकतेच शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भेट दिली होती. याबाबतची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. अजितदादांच्या गटातील एका मोठ्या नेत्याने शरद पवारांची भेट घेतल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. अशातच पाटील यांनी निकाल बघून काय निर्णय घ्यायचा हे भाजपने बनवलेला गट ठरवेल असं म्हटलं आहे. त्यामुळे पाटील यांचा नेमका रोख कोणाकडे आहे आणि खरंच काही नेते शरद पवार गटात जाणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड उद्धव ठाकरेच...

तर राजकीय नेत्यांनी अज्ञातवासात गेले तर त्याची चर्चा करण्याची एवढी गरज नाही. प्रायव्हसीची गरज असते, प्रचार केल्यानंतर एक-दोन दिवस सुट्टी घेतली म्हणून आकांत तांडव करणे गरजेचे नाही. भाजपला दोन पक्ष फोडूनही जनाधार मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे. जेवढे पक्ष घेतील तेवढा जनाधार कमी होणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा ब्रँड उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत. राज ठाकरेंचा वेगवेगळा वापर होतो, त्यामुळे त्यांच्यावर बोलणे योग्य नाही असं म्हणत पाटील यांनी भाजप आणि राज ठाकरेंवर टीका केली.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT