Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या विधानपरिषदेच्या तब्बल 17 जागा रिक्त आहेत. 2020 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने 3 वर्षांपासून टप्प्या-टप्प्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. आता या निवडणुका पार पडल्याने सर्व 17 जागांचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 3 महिन्यात या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
गेल्या 6 महिन्यात नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि 12 जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आहेत. उर्वरित 20 जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे झालेल्या नाहीत. पण 75 टक्के मतदारांच्या नियमामुळे 24 जिल्हा परिषदांच्या निवडणुका न होण्याचा विधानपरिषद निवडणुकीवर (Vidhan Parishad Election) फारसा परिणाम होणार नाही, असे निवडणूक आयोगातील एका माजी अधिकाऱ्याने सांगितले.
संबंधित मतदारसंघात 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार असल्यास या निवडणुका होऊ शकतात, यास निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. आज घडीला पुणे, सोलापूर, सातारा-सांगली आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 4 जागांवर 100 टक्के मतदार आहेत. तर जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित असलेल्या 24 जिल्ह्यांत नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका इथल्या मतदारांची संख्या 75 टक्क्यांच्या वरती जाते.
सहा महिन्यात उडणार निवडणुकीचा बार
आज घडीला जिल्हा परिषदेचे सदस्य वगळता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद सदस्यांची संख्या पाहता हा निकष पूर्ण होत आहेत. त्यामुळेच येत्या तीन महिन्याच्या कालावधीत निवडणूक आयोगाकडून जिल्हानिहाय मतदाराची यादी मागवून घेतली आहे. ही यादी मिळताच मतदार यादी पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार असून त्यामुळे येत्या सहा महिन्यात राज्यातील रिक्त असलेल्या 17 जागांसाठी निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे, असे आयोगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.
झेडपी सदस्य राहणार वंचित
राज्यातील 12 जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या आहेत. तर उर्वरित 20 जिल्हयातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणामुळे झालेल्या नाहीत. त्यामुळे येत्या काळात जर 75 टक्केपेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणच्या निवडणुका झाल्यास, या ठिकाणचे झेडपी सदस्य मतदानापासून वंचित राहू शकतात.
रिक्त असलेले 17 स्वराज्य संस्था मतदारसंघ :
ऑगस्ट 2025 : छत्रपती संभाजीनगर-जालना, नोव्हेंबर 2024 : नागपूर, जून 2024 : बीड-उस्मानाबाद-लातूर, परभणी-हिंगोली, नाशिक, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, डिसेंबर 2022 : पुणे, ठाणे-पालघर, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ, भंडारा-गोंदिया. जानेवारी 2022 : सोलापूर, अहमदनगर (अहिल्यानगर).
13 जागांवरील निवडणुकाकडे लक्ष
राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातील पुणे, सोलापूर, सांगली-सातारा व रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात विधानपरिषदेसाठी तयारी सुरु झाली आहे. या मतदारसंघातील मतदारांची यादी लवकरच निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध केली जाऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातील उर्वरित 13 जागांवरील निवडणुकासाठी आता सर्वांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या भूमिक्केकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.