Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : शपथ घेण्याआधीच अजितदादांकडून भावी मंत्र्यांना झटका; अडीच-अडीच वर्षेच मिळणार संधी...

Maharashtra Cabinet Expansion Mahayuti BJP NCP Shiv Sena : नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे.

Rajanand More

Nagpur : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी काही मिनिटांचाच कालावधी राहिलेला असताना अजित पवारांनी भावी मंत्र्यांना झटका दिला आहे. काही मंत्र्यांना केवळ अडीच-अडीच वर्षेच मंत्रिपद मिळणार असल्याचे अजितदादांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता हे ‘काही मंत्री’ कोण असणार, याची चर्चाही आतापासून रंगू लागली आहे.

नागपूरमध्ये 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. दुपारी चार वाजता मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्याआधी नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच भावी मंत्र्यांचे टेन्शन अजित पवारांनी वाढले आहे.

मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, जागा मर्यादित असतात. सगळेच ताकदीचे असतात. सगळेच योग्यतेचे असतात. मागीलवेळी दीड वर्षाची कारकीर्द काहींना मिळाली आहे. पुढील पाच वर्षांत काही लोकांना अडीच-अडीच वर्षेच संधी द्यायची, असे आम्ही ठरवले आहे. म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्यात सामावून घेतले जातील. अनेक जिल्ह्यांना, भागाला त्यात संधी मिळेल. आमच्या तिघांमध्येही एकवाक्यता झाली आहे, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

महामंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्ती दीड-दोन महिन्यांतच पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच वर्षे तुम्हाला ताटकळत ठेवणार नाही. आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात ते केले जाईल. लवकर याद्या तयार करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

पक्षामुळे ज्यांना मंत्रिपदं मिळतात, त्यांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मला वेळचं मिळाली नाही, अशा तक्रारी अजित पवारसह कुणीही सांगता कामा नयेत. तक्रारी यायला लागल्या तर नाईलाजास्तव ह्यांना बाकीचाच व्याप जास्त दिसतोय, संघटनेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. असे मनात आणून वेगळा निर्णय झाला, तर गैरसमज करून घेऊ नये, अशा शब्दांत अजित पवारांनी शपथविधीआधीच भावी मंत्र्यांना इशारा दिला. कुणा एकाला डोळ्यासमोर ठेऊन बोलतोय, असा गैरसमज करून घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अलीकडच्या काळात पक्षाची शिबीरे थोडी कमी झाली आहेत, असे सांगत अजित पवारांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुचना केल्या. त्यांनी प्रामुख्याने विदर्भ आणि मुंबईत पक्ष अधिक बळकट करण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे संकेत दिले. त्यासाठी त्यांनी मंत्र्यांकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे मंत्रिपदी वर्णी लागणाऱ्या नेत्यांना पक्ष संघटनेतही सक्रीय राहावे लागणार असल्याचे सूचक विधानही पवारांनी केले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT