Crop Loss_Maharashtra Floods 
महाराष्ट्र

Maharashtra Floods: अतिवृष्टीची मदत थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात! किती पैसे जमा झाले? जाणून घ्या

Maharashtra Flood Compensation: राज्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी राज्य शासनानं नुकतंच ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. तसंच दिवाळीपूर्वीच पैसे खात्यात जमा होतील असंही सांगण्यात आलं होतं.

Amit Ujagare

Maharashtra Flood Compensation: राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं आणि महापुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. अनेकांचे संसार वाहून गेले, घरं भिजली पशुधन वाहून गेलं. त्यामुळं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांला राज्य शासनानं नुकतीच ३२ हजार कोटींची मदत जाहीर केली. त्यासाठी निकषही लागू केले आणि ज्या पद्धतीचं नुकसान झालं त्याच्या मदतीची रक्कमही निश्चित केली होती. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं.

त्यानुसार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुळजापूर-धाराशिवचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी फेसबूकवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "अनुदानाची रक्कम जुलै-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या जिरायती पिकाच्या नुकसानाची आहे. रु. ८,५०० प्रति हेक्टर प्रमाणे २ हेक्टरच्या मर्यादेत रु. १७,००० जमा झाले आहेत. नवीन निकषांप्रमाणं रू. १८,५०० प्रति हेक्टर (आधी वितरित रकमेसह) अनुदान मिळणार आहे. हे अनुदान ३ हेक्टर मर्यादेपर्यंत असणार आहे.

दरम्यान, सध्याचं अनुदान हे जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचं आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील बीड, धाराशीव, जालना, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील काही भाग तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव या भागातही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती.

या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रत्यक्षात भेटी देऊन पूराच्या स्थितीचा आढावा घेतला होता. दरम्यान, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती. पण सरकार दरबारी 'ओला दुष्काळ' ही संकल्पना नाही, ऐवजी अतिवृष्टी आणि सततचा पाऊस या नावाखालीच मदत जाहीर केली जाऊ शकते असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती.

त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राज्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. यामध्ये पिकांचं नुकसान (बागायती/जिरायती), जमीन खरवडून गेल्याचं नुकसान, पोल्टी फार्म उद्ध्वस्त, पशुधन वाहून गेल्याचं नुकसान अशा आणि विविध प्रकारच्या नुकसानीसाठी विशिष्ट रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, आता पूरग्रस्तांना ती मदत वितरीत केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT