Ajit Pawar-Devendra Fadnavis-Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Government : अतिवृष्टीच्या मदतीत गोलमाल? जाहीर केलेल्या 2 हजार कोटींपैकी सप्टेंबरमधील नुकसानीसाठी एक रुपयाही नाही

Maharashtra Government : मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१ लाख शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटींची मदत जाहीर केली. मात्र सप्टेंबर अतिवृष्टीतील नुकसानीसाठी अद्याप मदत घोषित झालेली नाही.

Hrishikesh Nalagune

Maharashtra Government : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ट्रॅक्टर, कडबा कुट्टी आणि घरातील जीवनावश्यक वस्तू, वाहने वाहून जाऊन हजारो कोटींचे नुकसान झाले.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सुमारे ३१ लाख शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. ही रक्कम काही दिवसांत बँक खात्यात जमा होईल असेही सांगितले आहे.

प्रत्यक्षात मात्र ही मदत जून ते ऑगस्ट या ३ महिन्यांत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीची आहे. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत एक रुपयाही जाहीर झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने अतिवृष्टीचे अनुदार जाहीर करण्यात चालाखी केली असून ही घोषणा आकड्याची बनवाबनवी आणि संभ्रम निर्माण करणारी असल्याची चर्चा आहे.

राज्य सरकारने मंगळवारी (23 सप्टेंबर) अतिवृष्टी अनुदानापोटी १ हजार १३३ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देणारा शासन निर्णय प्रसिद्ध केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ हजार २१५ कोटी दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यापैकी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १ हजार ८२९ कोटी रुपये वितरित केले असून ३१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा होणार आहे.

तसेच उर्वरित रक्कम दोन ते तीन दिवसांतच जमा होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पण ही मदत जून ते ऑगस्ट दरम्यानच्या नुकसानीसाठीची आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली पिके असलेल्या मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा या मदतीचा लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पुढील काळात पंचनामे प्राप्त झाल्यानंतर मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

एकरी दोन-तीन हजारांचीच मदत?

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यानच्या अतिवृष्टीची मदत दोन-तीन महिन्यांनंतर केली जात आहे. म्हणजेच ही तातडीची मदत नाही. त्यातही अद्याप शेतकऱ्यापर्यंत ती पोचली नाही. अतिवृष्टी, अनुदानाचे दर आणि निकष बदलून शेतकऱ्यांना कमीत कमी मदत कशी मिळेल, याचा जून महिन्यातच सरकारने विचार केला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना एकरी २-३ हजार रुपयेच मदत मिळेल, असे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT