Maharashtra Government Employees: महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणारी ही हिंदी भाषा परीक्षा यापुढे घेतली जाणार नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर शासकीय कामकाजासाठी मराठी भाषेचा वापर होत असून, सध्याच्या प्रशासकीय परिस्थितीत हिंदी भाषा परीक्षा सुरू ठेवणे उचित नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ७ मे २०२६ पासून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. शासन निर्णयाचा क्रमांक विश्वको-2025/प्र.क्र.128/भाषा-2 असा आहे. या निर्णयानुसार भाषा संचालनालयाद्वारे घेण्यात येणारी तसेच पूर्वी एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
शासन निर्णयात या परीक्षेची पार्श्वभूमीही स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारकडून शासकीय प्रयोजनांसाठी हिंदी भाषेचा वापर केला जात होता. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले होते.
मात्र, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला. राज्यातील शासकीय कामकाजासाठी मराठी भाषेचा वापर केला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या परिस्थितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांवर लागू असलेली हिंदी भाषा परीक्षा आता सुरू ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे शासनाने म्हटले आहे.
हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्यामागे सध्याच्या शासकीय कामकाजाची वस्तुस्थितीही महत्त्वाची ठरली आहे. शासनाच्या म्हणण्यानुसार, सरकारी कामकाजात हिंदी भाषेचा वापर अत्यंत नगण्य आहे. केंद्र सरकार तसेच इतर राज्यांशी होणारा अधिकृत पत्रव्यवहार प्रामुख्याने इंग्रजी भाषेत केला जातो.
महाराष्ट्र राजभाषा अधिनियमातील तरतुदी आणि सध्याच्या शासकीय कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता हिंदी भाषा परीक्षा लागू ठेवणे संयुक्तिक नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाषा संचालनालयामार्फत घेतली जाणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शासन निर्णयात स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले आहे की, भाषा संचालनालयाद्वारे घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्यात येत आहे. यामध्ये पूर्वी एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचाही समावेश आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना या परीक्षेसाठी यापुढे बसण्याची आवश्यकता राहणार नाही.
हिंदी भाषा परीक्षेसंदर्भात आतापर्यंत जारी करण्यात आलेले संदर्भित शासन निर्णय तसेच त्यासंबंधित इतर सर्व शासन निर्णय, परिपत्रके, आदेश आणि शासनपत्रे या नव्या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात आली आहेत.म्हणजेच हिंदी भाषा परीक्षा लागू करण्यासाठी यापूर्वी अस्तित्वात असलेल्या संबंधित प्रशासकीय आदेशांना आता या निर्णयामुळे पूर्वीचे महत्त्व राहणार नाही.
या निर्णयातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्याची पूर्वलक्षी अंमलबजावणी शासन निर्णय ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जारी झाला असला तरी त्याची अंमलबजावणी ७ मे २०२६ पासून , म्हणजेच हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती देण्यात आलेल्या दिवसापासून करण्यात येणार आहे.त्यामुळे ७ मे २०२६ पासून हिंदी भाषा परीक्षेसंदर्भातील ही व्यवस्था रद्द मानली जाणार आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. शासन निर्णयाचा संगणक संकेतांक 202608311822452433असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीच्या काळापासून सुरू असलेली हिंदी भाषा परीक्षा आता अधिकृतपणे रद्द झाली आहे. महाराष्ट्रातील शासकीय कामकाजात मराठीचा वापर, हिंदीचा अत्यल्प वापर आणि केंद्र तसेच इतर राज्यांशी प्रामुख्याने इंग्रजीत होणारा पत्रव्यवहार या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.