Maharashtra government on juvenile offender age limit: राज्यात वाढत्या बालगुन्हेगारीवर आता सरकार कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असून, बाल गुन्हेगारांसाठी असलेली 18 वर्षांची वयोमर्यादा कमी करून ती 16 वर्षांपर्यंत आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. याचबरोबर अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे ढकलणाऱ्या टोळ्यांवर आता थेट संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा गाजला. अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुद्दा उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, सध्या कायद्यानुसार विधिसंघर्षित बालकांना थेट अटक न करता बालगृहात ठेवण्याची तरतूद आहे. मात्र काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याच तरतुदीचा गैरफायदा घेत असून 16 वर्षांखालील मुलांकडून गंभीर गुन्हे करवून घेत असल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकार वाढत्या बालगुन्हेगारीच्या (Crime) मुळापर्यंत जाण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमणार आहे. या समितीद्वारे वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून बालकांचा वापर करणाऱ्या टोळ्या, त्यामागील रॅकेट आणि संघटित गुन्हेगारीशी संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाईसाठी नवे पर्याय तपासले जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुख्यात लाॅरेन्स बिश्नोई टोळीच्या महाराष्ट्रातील नव्या गुन्हेगारी पद्धतीचाही धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले की, ही टोळी आता खंडणीची धमकी दिल्यानंतर थेट भाडोत्री गुंडांच्या माध्यमातून संबंधित व्यापाऱ्यांच्या घराजवळ किंवा कार्यालयाबाहेर गोळीबार करून दहशत निर्माण करत आहे.
रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका फर्निचर व्यावसायिकाच्या दुकानावर झालेल्या गोळीबाराचा मुद्दा उपस्थित केला होता. या हल्ल्याची जबाबदारी समाजमाध्यमांवर बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचे समोर आले होते. व्यापाऱ्याकडे खंडणी मागण्यात आली होती आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील व्यापारी वर्ग दहशतीच्या छायेत असल्याचा गंभीर आरोप केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, बिश्नोई टोळीचे दोन प्रमुख सदस्य आधीच तुरुंगात आहेत. आता त्यांचा धाकटा भाऊ आरजू बिष्णोई सक्रिय झाला आहे. ही टोळी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील धनाढ्य व्यापाऱ्यांना VPN कॉल्सद्वारे धमक्या देते, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधून भाडोत्री गुंडांना पैसे देऊन व्यापाऱ्यांच्या दुकानांबाहेर किंवा घराजवळ गोळीबार घडवून आणते.
फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, सरकारने अनेक भाडोत्री गुंडांना आधीच ताब्यात घेतले आहे. मात्र केवळ शूटरच नव्हे, तर बाहेरून संपूर्ण कट रचणाऱ्या मूळ सूत्रधारांनाही केंद्र सरकारच्या मदतीने शोधून पकडले जाईल. राज्यात दहशत निर्माण करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.