OBC Reservation Maharashtra : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या तब्बल 14,237 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यंदाच्या निवडणुकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 50 टक्के आरक्षण मर्यादा काटेकोरपणे लागू केली जाणार असल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या आरक्षण रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) यासंदर्भात सविस्तर आदेश जारी केले असून, ज्या ग्रामपंचायतींमध्ये एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होत आहे, तेथे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (OBC) जागांमध्ये आवश्यक कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नव्याने आरक्षण प्रक्रिया राबवली जाणार आहे.
19 जूनला प्रभागनिहाय आरक्षण (Reservation) प्रारूप प्रसिद्ध होईल. पुढे 19 ते 25 जूनला आरक्षण निश्चितीबाबत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. तीन जुलैला उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्राप्त हरकतीवर अभिप्राय द्यायचा आहे. आठ जुलैला उपविभागीय अधिकारी यांचा अभिप्राय विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम अधिसूचनेस मान्यता द्यायची आहे. दहा जुलैला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेस प्रसिद्धी दिली जाणार आहे.
नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा 27टक्क्यांच्या आता ठेवण्यासाठी, सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जागांची टक्केवारी 1.89 असली, तरी एकच जागा राखीव होणार आहे. 9 सदस्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये 2.43च्या आणि 11 सदस्यीय ग्रामपंचायतींमध्ये 2.97च्या तुलनेतही दोनच जागा असणार आहेत. 13 सदस्यीय ग्रामपंचायतींमध्ये 3.51च्या तुलनेत 3 जागा, 17 सदस्यीय ग्रामपंचायतींमध्ये 4.59च्या तुलनेत 4 जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. तसेच एकूण आरक्षण 50 टक्के व नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण 27 टक्क्यांच्या आत ठेवण्यासाठी अपूर्णांक दुर्लक्षित न करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यात विभागनिहाय विचार केल्यास अमरावती विभागात 2,451, नागपूर विभाग 1,508, कोकण विभाग 798, नाशिक विभागात 2,476, पुणे विभागामध्ये 2,870, छत्रपती संभाजीनगर विभागात 4,134, अशा एकूण 14,237 ग्रामपंचायतीच्या निवडणुका येऊ घातल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर पुढे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा बँकांच्या निवडणुकांपूर्वी या निवडणुका जाहीर होतील, असा अंदाज आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण प्रक्रियेचे वेळापत्रक, यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर करण्यात आले होते. 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचे नियोजनही होते. मात्र, 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या नव्या अंमलबजावणीमुळे संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवावी लागत आहे.
दरम्यान, विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकांनंतर राज्यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांचे वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा रंगणार असून, येत्या काही आठवड्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.