Mumbai News : राज्यातील रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागेसाठी 18 जूनला मतदान होणार आहे. त्यासाठी सध्या सर्वच पक्षात जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. निवडणुका होत असलेल्या या 17 जागेवरील संख्याबळ पाहता महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः या विधानपरिषद निवडणुकीत चार हजार मतदार असलेल्या भाजपला सर्वाधिक जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसला विदर्भातील दोन जागेवर संधी आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यातील निवडणुका होत असलेल्या 17 जागेवर संख्याबळ पाहता यामध्ये महायुतीमधील भाजप मोठा भाऊ ठरला आहे. भाजपचे चार हजार मतदार आहेत, तर त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 1700 मतदार आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 1600 मतदार आहेत. त्या खालोखाल 1430 मतदार काँग्रेसचे आहेत. यामध्ये स्वीकृत सदस्यांचा समावेश केलेला नाही.
त्याशिवाय अपक्षांची संख्या 568 इतकी आहे तर आघाडीच्या सदस्यांची संख्या 693 इतकी आहे. त्यामुळे हे मतदार प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांना ओढण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाकडून केला जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजारही होऊ शकतो. त्यासोबतच स्थानिकांच्या निवडणुकीत एमआयएमला मोठे यश मिळाले आहे. मात्र, त्यांची संख्या इतरांच्या तुलनेत नगण्य आहे.
विधान परिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असले, तरी जिंकण्यासाठी भाजपला (BJP) मित्रपक्षांची गरज पडणार आहे. त्याचवेळी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपची मदत ही शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे एकेमकांच्या सहकार्याशिवाय निवडणूक जिंकणे अशक्य आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसला (Congress) मुख्यत्वे चंद्रपूर-गडचिरोली-तर्धा या मतदारसंघात संधी आहे. भाजप आणि काँग्रेसच्या संख्याबळात त्याठिकाणी 30 चाच फरक आहे, पण मित्रपक्ष मिळून याठिकाणी भाजपची सरशी दिसते. अमरावतीमध्ये काँग्रेस मित्रपक्ष आणि अपक्ष आघाड्यांच्या मदतीने आव्हान देऊ शकते. अन्यत्र मविआला फारशी संधी नाही. महायतीत फूट पडली. तरच काही संधी त्यांना मिळू शकते.
महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटला नाही. शिंदेंच्या शिवसेनेने जरी भाजपकडे सात जागांची मागणी केली असली तरी त्यांना तीन जागा मिळू शकतात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा येऊ शकतात. त्यामुळे इतर 12 जागा भाजप लढणार असल्याचे समजते. त्यामुळे सर्वाधिक जागा भाजप जिंकू शकतो.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ या पाच जागेची मागणी केली आहे. त्यापैकी भाजपने त्यांना तीन जागा देण्याची तयारी दर्शविली आहे, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात जागावाटपात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी धाव घेतली आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.