

BJP and Shiv Sena tussle over Yavatmal MLC seat: विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ मतदारसंघात निवडणूक होत आहे. २०२० पासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रखडल्याने विधानपरिषद निवडणूक होऊ शकली नव्हती. मागील ६ महिन्यात २० जिल्हा परिषद वगळता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडली. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली असून १ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
या १७ मतदारसंघांमध्ये यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीतील संख्याबळ पाहता निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत. उमेदवारीसाठी महायुतीमध्ये भाजप व शिवसेनेत आणि महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये रस्सीखेच आहे.
यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा इतिहास पहिला तर हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेस (Congress) पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचे वर्चस्व असल्याने बहुतांश वेळा काँग्रेसचेच उमेदवार विजयी होत होते.
२०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत याठिकाणी एकसंध शिवसेनेचे नेते तानाजी सावंत विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणचा राजीनामा दिला होता.
२०२० मध्ये झालेल्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करीत विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला होता.
यंदा या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ५२४ मतदार आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ६२ जागा आणि पंचायत समिती सभापतींची १६ पदे रिक्त असल्याने प्रत्यक्षात ४०५ सदस्य मतदान करणार आहेत.
या संख्याबळात महायुती सध्या मजबूत स्थितीत असल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीकडे जवळपास २५० नगरसेवक असल्याचा दावा महायुतीचे पदाधिकारी करीत आहेत. महाविकास आघाडीकडेही १७० पेक्षा अधिक सदस्य असल्याने ही लढत सरळ आणि सोपी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकीय गणितानुसार महायुतीचे पारडे जड असले तरी अंतिम क्षणी मित्रपक्ष आणि अपक्ष सदस्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अनेक सदस्य सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
निवडणूक जाहीर होताच महायुतीमध्ये उमेदवारीवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे. ही जागा भाजपच्या (BJP) वाट्याला जाणार की शिवसेनेच्या, यावरून पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
यवतमाळ मतदार संघातून भाजपकडून माजी मंत्री मदन येरावार, सुमीत बाजोरीया, नितीन भुतडा यांची नावे चर्चेत आहेत, तर शिवसेनेकडून सलीम खेतानी, पांडव, साहेबराव कांबळे यांची नावे चर्चेत आहेत.
महायुतीमधील जागावाटपात जागा कोणाच्या वाट्याला येणार यावरून जोरदार रस्सीखेच दिसत आहे. आतापर्यंत शिवसेनेने या मतदार संघातून निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे यावेळेस कोणाला उमेदवारी दिली जाणार यावर सर्व काही अवलंबून आहे.
महाविकास आघाडीत ही निवडणूक लढविण्यावरून जोरदार रस्सीखेच दिसत आहे. ही निवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम आहे. त्यांच्याकडील उमेदवाराचे नाव निश्चितच नाही. तर दुसरीकडे या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जुळवाजुळव केली जात आहे. याठिकाणी त्यांच्या उमेदवारांचे नाव निश्चितच नाही. मात्र, निवडणूक लढण्यावर सेना ठाम आहे.