Operation Tiger Maharashtra Politics : राज्यातील पावसाळी विधिमंडळ अधिवेशनापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या चर्चित ‘ऑपरेशन टायगर’ने आता निर्णायक वळण घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या राजकीय हालचालींना सोमवारी रात्री अचानक वेग मिळाल्याचे दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena UBT) तब्बल सहा खासदार अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व खासदार काही काळासाठी ‘नॉट रिचेबल’ असल्याचे वृत्त समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना अधिक उधाण आले आहे.
या घडामोडींनंतर काही वेळातच शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीला पोहोचलेले ठाकरे गटाचे खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊ शकतात. या भेटीदरम्यान स्वतंत्र गट नोंदणीसंदर्भात पत्रव्यवहार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही खासगी वृत्तवाहिन्यांनीही यासंदर्भात मोठे दावे केले आहेत.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा रंगली आहे की, या खासदारांकडून भविष्यात स्वतंत्र गट निर्माण करून दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाचा पर्याय तपासला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील काही तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
राजकीय चर्चेनुसार, शिवसेना ठाकरे पक्षातील काही आमदारांमध्येही अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे 16 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. जर ही चर्चा खरी ठरली, तर शिवसेना ठाकरे पक्षासाठी हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जाईल.
दुसरीकडे दिवसभर उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी महत्त्वाच्या बैठका झाल्याची माहिती आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून सातत्याने ‘ऑपरेशन टायगर यशस्वी होणार नाही, पक्ष एकसंघ आहे’ असा दावा करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनीही पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे दिल्लीला दाखल झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर ‘ऑपरेशन टायगर’ला अंतिम स्वरूप दिले जाऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या आगामी वर्धापनदिनापूर्वीच शिवसेना ठाकरे पक्षातील खासदारांचा वेगळा गट तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, ‘ऑपरेशन टायगर’ खरोखर यशस्वी होते की शिवसेना ठाकरे पक्ष हे संकट टाळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.