Mumbai News : राज्यसभेच्या राज्यातील सात जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या 16 मार्चला मतदान होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच एकीकडे महायुतीच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत. त्यामध्ये विधानसभेतील संख्याबळ पहिले तर भाजप चार, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा येणार आहे. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. राज्यातील सात जागांपैकी तीन नावे फायनल? झाली आहेत तर 4 जागांसाठी राज्यातील 'या' दिग्गज नेत्यामध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येते. उमेदवार निवडीसाठी दिल्लीतून सूत्र हलणार आहेत. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यसभेच्या भाजपच्या (BJP) वाट्याला चार जागा आल्या आहेत. त्यापैकी एक जागा भाजपचा मित्रपसुख असलेल्या रिपाइंच्या वाट्याला जाणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची राज्यसभेची मुदत संपत असल्याने त्यांची उमेदवारी फायनल आहे. तर उर्वरित तीन नावासाठी भाजपने जवळपास 25 जणांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. त्यामुळे भाजपमध्ये या तीन जागेसाठी मोठी चुरस आहे. 25 जणांपैकी तीन नावे घोषित करण्याची जबाबदारी आता केंदीय समितीच्या असणार आहे. त्यामुळे या घोषणेकडे सर्वांचे लाख लागून राहिले आहे.
भाजपकडून या तीन जागेसाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, खासदार धैर्यशील पाटील, माजी मंत्री रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, भारती पवार यांचीही नावे चर्चेत आहेत. या पैकी तीन नावे फायनल केली जाणार आहेत. दुसरीकडे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रामदास आठवले या वरिष्ठ मंत्र्यांचा अपवाद वगळता भाजप राज्यसभेसाठी एका नेत्याला दुसऱ्यांदा संधी देत नाही. त्यामुळे यावेळेस काय रणनीती अवलंबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या (NCP) वाट्याला एक जागा आली आहे. त्या जागेसाठीच्या उमेदवारांची घोषणा शुक्रवारीच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केली आहे. या जागेसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता एका उमेदवारासाठी 37 मतांचा कोटा असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार असल्याने त्यांचा एक उमेदवार निवडून येऊन तीन मते शिल्लक राहणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आली आहे. या एका जागेसाठी माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात शेवाळे यांची मोठी मदत झाली होती. त्यामुळेच शेवाळे यांना मुंबईतील विजयाची बक्षिसी म्हणून राज्यसभेची लॉटरी लागू शकते. दुसरीकडे या पदासाठी माजी खासदार गजानन कीर्तिकर, माजी खासदार संजय निरुपम, आनंदराव अडसूळ हे इच्छुक आहेत. या चार जणांत सध्या जोरदार रस्सीखेच सुरु असली तरी यामध्ये राहुल शेवाळे यांचे पारडे जाड वाटत आहे. उमेदवार ठरविण्याबाबत दोन दिवसापूर्वीच शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली आहे. त्यामध्ये नाव फायनल करण्यात आले असल्याचे समजते.
महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच
महाविकास आघाडीचे चार सदस्य निवृत्त होत असताना त्यांच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यामुळे काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. आघाडीतील तीन पक्ष एकमेकांशी बोलत असले तरी प्रत्येकाची इच्छा ही एक जागा आपल्या वाट्याला यावी, अशी इच्छा आहे. शरद पवार हे निवृत्त होणार आहेत त्यांनी जर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली तर इतर दोन पक्ष त्यांच्यासाठी जागा सोडू शकतात. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हे इच्छुक आहेत तर काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब थोरात यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या या नेतेमंडळींपैकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.