Maharashtra school news Sarkarnama
महाराष्ट्र

School Education news : राज्यातील तब्बल 829 शाळांवर मान्यता रद्दची टांगती तलवार; विद्यार्थ्यांचे होणार समायोजन, सरकारने काढला आदेश...

Education department order : संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर मान्यतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांकडे अर्ज केलेल्या शाळांना कायद्यानुसार मान्यता दिली जाईल.

Rajanand More

Maharashtra school news : राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांबाबत महत्वाची बातमी आहे. कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या राज्यातील शासनमान्य खाजगी शाळा व तुकड्यांना मुल्यांकन निकषानुसार वेतन अनुदान टप्प्याटप्याने देण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र निकषांनुसार वारंवार मुल्यांकन करूनही अपात्र ठरणाऱ्या शाळांबाबत आता सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

एखादी शाळा सतत तीन वर्षे सलग मुल्यांकनात अपात्र ठरल्यास त्या शाळेची परवानगी किंवा मान्यता आपोआप रद्द होईल, अशी तरतूद यापूर्वीच करण्यात आली आहे. तरीही मुल्यांकनाची संधी वारंवार देऊनही त्यात अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्याची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आलेली नव्हती. मात्र, आता सरकारने मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

आता राज्य सरकारने वेळोवेळी मुल्यांकन होऊनही वारंवार अपात्र ठरलेल्या राज्यातील ३२४ माध्यमिक आणि ५०५ उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये तसेच माध्यमिकच्या ४१२ तुकड्या आणि उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ३८२ तुकड्यांना वेतन अनुदानासाठी कायमस्वरुपी अपात्र घोषित केले आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरूवारी जारी करण्यात आला आहे. आता या शाळा किंवा तुकड्यांना स्वयंअर्थसहाय्यित अधिनियमातील तरतुदीनुसार शासन मान्यतेसाठी अर्ज करावा लागेल.

संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर मान्यतेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांकडे अर्ज केलेल्या शाळांना कायद्यानुसार मान्यता दिली जाईल. अर्ज न करणाऱ्या शाळांची मान्यता आपोआप रद्द होईल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांचे समायोजन

मान्यता रद्द होणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन सोयीनुसार जवळच्या खाजगी अनुदानित, स्थानिक, नागरी स्वराज्य संस्थेच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये करण्यात येईल. संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडून ता. १ मे ते ३१ मे या कालावधीत समायोजन पूर्ण केले जाईल. सुट्टीच्या कालावधीत प्रत्यक्ष समायोजनाची कार्यवाही सुरू करावी, असे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता संबंधित शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी व पालकांसमोर अडचणी उभ्या ठाकण्याची शक्यता आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT