Mahayuti Aaghadi Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti BJP Politics : महायुतीत झाले १६ भिडू, लोकसभेत जमेना, विधानसभेत काय घडेल?

Sampat Devgire

Loksabha election 2024 : महायुतीच्या जागा वाटपाचे घोडे अद्यापही आडलेलेच आहे. तीन पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही. अशा स्थितीत महायुतीत मनसेच्या राज ठाकरे यांच्या प्रवेशाने 16 भिडू झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे जागावाटप दिव्य ठरण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात महायुतीला पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा जाहीर करतानाच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले. कार्यकर्त्यांनी आता विधानसभेच्या तयारीला लागावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथील मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीची स्वप्न पडू लागली आहेत. मनसेला कोणत्या व किती जागा मिळतील हे नक्की नाही. मात्र मनसेच्या अनेक इच्छुकांना विधानसभेची स्वप्न पडू लागतील हे नक्की.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (SHIV SENA) एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तीन प्रमुख पक्ष आहेत. याशिवाय 'रासप'चे महादेव जानकर यांना एक जागा देण्यात आली आहे. लोकसभेच्या राज्यातील ४८ जागांचे वाटप कसे? व कोणत्या तत्त्वावर करावे याबाबत गेल्या दोन आठवड्यांमध्ये चर्चेच्या विविध फेऱ्या झाल्या. मात्र ठोस निर्णय बाहेर येऊ शकला नाही. अद्यापही राज्यातील पाच जागांचा वाद सुरू आहे. त्यावर कसा तोडगा शोधावा याचे उत्तर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना सापडलेले नाही. यात जो निर्णय होईल, त्यातून नक्कीच काही पक्ष व सहकारी नाराज होतील.

त्यामुळे निवडणुकीचे जागावाटप नेहमीच मतभेदाचा विषय राहिला आहे. सामोपचाराने मार्ग काढला तरीही सगळ्यांचे समाधान करणे अशक्य असते. त्यामुळे अनेकदा वरिष्ठ नेते तसेच पक्षाचे कार्यकर्ते जाहीर मतभेद प्रकट करीत असतात. त्यावरून होणारे वादविवाद निवडणुकीत अडचणीचे देखील ठरतात काही वेळा त्याचा निवडणुकीचा निकालावर परिणाम होतो. त्यामुळे जागा वाटप हा आघाडीमध्ये कळीचा मुद्दा असतो.

भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील (MAHARASHTRA) महायुतीमध्ये जवळपास १९ पक्ष होते. सध्या यामध्ये १५ महत्त्वाचे पक्ष आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), जे.एस.एस., आर. एस.पी., पी.जे.पी., स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, ब.वी. एकता मंच, आरपीआय (खरात गट), शिवसंग्राम आदी पक्ष आहेत. यातील शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योतीताई मेटे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत.या पक्षांच्या यादीत आता मनसेची भर पडली आहे.

या लहान लहान पक्षांना विधानसभा निवडणुकीत काही जागांची अपेक्षा नक्कीच असेल. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे (BJP) सध्या १०५ आमदार आहेत. पाच आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट या सर्वांची मिळून जवळपास दोनशे आमदार होतात. अशा स्थितीत २८८ जागांचे वाटप करताना नेत्यांची अवस्था अतिशय बिकट होण्याची शक्यता आहे. यातील विविध पक्षांच्या नेत्यांचे समाधान करणे म्हणजे अक्षरशा दिव्य ठरू शकते. त्यामुळे लोकसभेच्या ४८ जागांच्या वाटपात एवढी ओढाताण होत आहे, तर १६ पक्षांना बरोबर घेऊन विधानसभेचे जागावाटप ही तारेवरची कसरत ठरेल यात शंका नाही.

(Edited by - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT