Mumbai News : राज्यातील रिक्त असलेल्या 17 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी बैठकांचे सत्र सुरुच आहे. विशेषतः जादा जागा मिळाव्यात यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आग्रही आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी हजेरी लावली आहे. ठाणे-पालघर, छत्रपती संभाजीनगर-जालना ही हक्काची जागा मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, भाजपकडून संख्याबळाच्या जोरावर हे दोन मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. त्या दोन मतदार संघाच्या बदल्यात दुसराच मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचे समजते. त्यासाठी महायुतीने 'मास्टरप्लॅन' बदलला असल्याची चर्चा आहे.
महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आला असून त्यानुसार भाजप(BJP) 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1अशा प्रकारे जागावाटप होणार असल्याची माहिती सूत्रांने दिली आहे. या नव्या फॉर्म्युलानुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गची ही एकच जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या वाट्याला ठाणे, नाशिक, यवतमाळ या जागा पूर्वी ठरल्याप्रमाणे देण्यात येणार आहेत. तर ठाणे-पालघर, छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेच्या बदल्यात शिंदे सेनेला परभणी-हिंगोलीची जागा जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पुण्यावर भाजपकडून आपला दावा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही. मात्र, आणखीनही काही जागेची अदलाबदल होऊ शकते.
महायुतीमध्ये सुरुवातीला जो प्राथमिक फॉर्म्युला ठरत होता, त्यानुसार भाजप 12 जागा, शिवसेना 3 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 2 जागा लढवणार असल्याची चर्चा होती. महायुती म्हणून एकत्र लढण्यावर तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले आहे. काही पारंपरिक जागांची अदलाबदल केली जाणार असल्याचे कळत आहे.
महायुतीमध्ये यापूर्वी भाजप 12, शिवसेना 3 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या आग्रहानंतर आणखी एक जागा वाढविण्यात आली आहे. जागावाटपावर फायनल शिक्कामोर्तब करण्यासाठी आज किंवा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक पार पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या बैठकीतीच अंतिम निर्णय तिन्ही नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असले, तरी जिंकण्यासाठी भाजपला मित्रपक्षांची गरज पडणार आहे. त्याचवेळी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपची मदत ही शिंदेसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे एकेमकांच्या सहकार्याशिवाय निवडणूक जिंकणे अशक्य आहे. त्यामुळेच महायुतीच्या बैठकांचे सत्र सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.