Mahayuti Politics  Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti News : महायुतीचा सत्ता राखण्यासाठीचा प्लॅन तयार; तीन पक्षांनी घेतली इतक्या जागांची जबाबदारी

Sachin Waghmare

Mumbai News : तोंडावर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आतापासूनच विविध मतदारसंघाची चाचपणी करून आढावा घेतला जात आहे, तर काही जणांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे.

महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यातच आता महायुतीकडून येत्या काळात सत्ता राखण्यासाठीचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून ही रणनीती यशस्वी करण्यासाठी तीन ही घटक पक्ष कामाला लागले आहेत. (Mahayuti News)

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 288 पैकी 145 जागा जिंकाव्या लागणार आहेत. त्यानंतरच बहुमत मिळवून सत्ता पुन्हा राखता येणार आहे. त्यासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नुकत्याच त्या संबधी झालेल्या बैठकीत रणनीती ठरली आहे. त्याची अंमलबजावणी करून येत्या काळात बहुमत मिळवण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे.

महायुतीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जागा राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जास्तीत जास्त जागी विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळेच अजित पवार गटाला कमीत कमी 30 जागा जिंकाव्या लागणार आहेत.

विशेषतः आघाडीतील तीन पक्षाकडून अजित पवार गटाला टार्गेट केले जाणार असल्याने त्यांच्या कमी जागा येतील असा अंदाज आहे. त्यामुळे महायुतीला बहुमताचा आकडा गाठत असताना कसरत करावी लागणार आहे. त्याचवेळी निवडून येण्याची क्षमता असलेले 25 चेहरे जवळ असणे ही देखील अजित पवार गटाची जमेची बाजू असणार आहे. त्यामुळेच भाजपमध्ये (BJP) त्यांना सोबत ठेवण्यावरून नाराजी असली तरी ते दूर करण्याचे प्रयत्न केले जातील पण अजित पवार गटाला दूर केले जाण्याची शक्यता खूप कमी आहे.

महायुतीमधील भाजप व शिवसेना शिंदे गट या दोघाना मिळून शंभर जागांची तजवीज करावी लागणार आहे. त्यामध्ये भाजप 65 ते 70 जागा तर शिंदे गट 30 ते 35 जागा जिंकेल, असा अंदाज आहे. अजित पवार गटाचे 30 आमदार निवडून येणार असतील तर हा आकडा 130 पर्यंत जाईल. बहुमताच्या जवळ जाण्यासाठी आणखी 15 जागाची आवश्यकता भासणार आहे.

बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी महायुतीला निवडून येणाऱ्या दहा ते पंधरा अपक्ष आमदारांना सोबत घ्यावे लागणार आहे, तरच बहुमत सिद्ध करता येणार आहे. त्यामुळे येत्या काळात हे समीकरण जुळवून आणणे फार महत्त्वाचे आहे.

त्यामुळे आता या ठरलेल्या नियोजनापैकी कोण किती जागांची जोडणी करणार ? यावर सत्तेचे समीकरण अवलंबून असणार आहे. त्यामुळे येत्या काळात कोणाची रणनीती सरस ठरणार ? यावर राज्यात येत्या काळात सत्ता कोणाची येणार हे स्पष्ट होणार असून त्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT