Narayan Rane, Laxman Hake, Manoj jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Narayan Rane : आरक्षणावरुन मराठा-ओबीसी वाद टोकाला; राणेंना झाली थेट शिवाजी महाराजांची आठवण, म्हणाले...

Jagdish Patil

Narayan Rane News : महाराष्ट्रात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा (Maratha-OBC Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. दोन्ही बाजूंनी आरक्षणाबाबत परस्परविरोधी भूमिका घेतली जात आहे. याच मुद्द्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपदेखील सुरु झाले आहेत. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरक्षणावरुन दोन समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करत आहेत.

मात्र, आरक्षणावरुन हेच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आता भाजप खासदार नारायण राणे यांना थेट शिवाजी महाराजांची आठवण झाली आहे. राज्यातील राजकारण थांबवा, सलोखा राखा असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी महाराष्‍ट्रामध्‍ये सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु असल्याचं म्हटलं आहे. तसंच हे सर्व राजकीय फायद्यासाठी सुरु असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे.

एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये राणे यांनी लिहिलं आहे, "राजकारण थांबवा! सलोखा राखा! छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या शिवकल्‍याणकारी महाराष्‍ट्रामध्‍ये सध्‍या जाती-जातींमध्‍ये द्वेषाचे विष कालवून जातीय सलोखा धोक्‍यात आणण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. विविध विचारसरणीचे आणि त्‍यातही नव्‍याने पुढे आलेले काही नेते किरकोळ राजकीय फायदा नजरेसमोर ठेऊन दुहीचे आणि द्वेषाचे विष कालविण्‍याचे पाप करीत आहेत.

सर्वसामान्‍यांच्‍या हितासाठी जाती-जातींमध्‍ये संघर्ष निर्माण करीत असल्‍याची बतावणी ही मंडळी करतात. संघर्षामध्‍ये शेवटी सर्वसामान्‍यांचे बळी जातात व नुकसान होते. हे मात्र ते विसरतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या (Shivaji Maharaj) महाराष्‍ट्रामध्‍ये ऐतिहासिक काळापासून जातीय सलोख्‍याचे वातावरण आहे आणि गावा-गावांमध्‍ये लोक गुण्‍यागोविंद्याने नांदतात. या वातावरणाला नख लावण्‍याचे प्रयत्‍न हाणून पाडले पाहिजेत. सर्व जबाबबदार राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन महाराष्‍ट्रातील जातीय सलोखा कायम रहावा यासाठी प्रयत्‍न करावेत असे मला वाटते."

राणे यांनी या ट्विटच्या माध्यमातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता राणेंच्या ट्विटवर मराठा आणि ओबीसी (OBC) आंदोलक काय प्रतिक्रिया देतात हे पाहण महत्वाचं आहे.

आंदोलकांच्या मागण्या काय?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, तसंच सगेसोयरे बाबतचा अध्यादेश काढावा यासह अनेक मागण्या केल्या आहेत. मात्र, जरांगे यांच्या मागण्यांवर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आक्षेप घेतला आहे. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करु नये अशी भूमिका हाके यांनी घेतली आहे. त्यामुळे आरक्षणाचा वाद चिघळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT