Manoj Jarange Patil Satrkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचं ठरलं सात दिवसांत सात जिल्हे फिरणार !

Chaitanya Machale

Jarange Patil News : ओबीसीमधून मराठा समाजाला हक्काचे आरक्षण द्यावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी नवीन रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटील आपला दौरा काढणार असून 7 दिवसात 7 जिल्ह्यांमध्ये ते दौरे करणार आहेत. 7 ऑगस्टपासून या दौऱ्याची सुरुवात केली जाणार आहे.

मराठा (Maratha) समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. 20 जुलैला त्यांनी सुरु केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले असून मराठा समाजामध्ये आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी आता दौरे काढण्यास सुरुवात केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौरा काढणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातून या दौऱ्याचा श्रीगणेशा केला जाणार आहे. जरांगे पाटील सात दिवसात सात जिल्ह्यात हा दौरा काढणार आहेत. या दौऱ्याची तयारी सकल मराठा समाजाकडून केली जात आहे. यासाठी कोणीही विरोध न करण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

जरांगे पाटील 7 ऑगस्टला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर (Solapur) येथे पोहचणार आहेत. तेथे रॅली काढली जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही शांतता रॅली काढली जाणार आहे. या दौऱ्यामध्ये जरांगे पाटील यांना विरोध तसेच कोणीही टीका न करण्याचे आवाहन धनाजी साखळकर यांनी केले आहे. मराठा समाजाची ही शांतता रॅली न राहता समाजाची त्सुनामी असेल, असेही साखळकर यांनी सांगितले.

ही रॅली कोणत्याही पक्षाची नाही. तसेच कोणाच्याही विरोधात नाही, मात्र मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या भूमिकेला कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध करू नये तसेच वेगळे वळण द्यायचा प्रयत्न करून त्यांना बदनाम करु नये. जरांगे यांच्या विरोधात कोणी मराठा नेता सहभागी झाल्याचे समोर आल्यानंतर अगदी मराठा समाजाचा नेता असला तरी त्याची अवस्था खंडोजी खोपडे किंवा सूर्याजी पिसाळ अशी करू, असा इशारा धनाजी माने यांनी दिला आहे.

मराठा नेते जरांगे पाटील हे सात ऑगस्टला सोलापूर येथे शांतता रॅली काढणार आहेत. त्यानंतर 8 ऑगस्टला सांगली, 9 ऑगस्टला कोल्हापूर, 10 ऑगस्टला सातारा जिल्हा, तर 11 ऑगस्टला पुणे, 12 ऑगस्टला अहिल्यानगर, 13 ऑगस्टला नाशिक जिल्ह्यात हा दौरा काढून शांतता यात्रेची सांगता होणार आहे. 'सांगावा आलाय पाटलांचा, पुढील मोहिमेचा...' अशा पद्धतीचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये फिरताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT