Hingoli Farmers news | Devendra Fadanvis
Hingoli Farmers news | Devendra Fadanvis 
मराठवाडा

Hingoli Farmers news : फडणवीस खोटं बोलले; शेतकऱ्याची पोलीसात तक्रार

सरकारनामा ब्यूरो

Farmer Police Complaint against Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज तोडू नये असे आदेश दिले होते. तरीही हिंगोलीतील एका शेतकऱ्याची वीज तोडण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्याने थेट पोलिस ठाणे गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दशरथ गजानन मुळे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपुर्वी फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या वीज पंपाची वीज न तोडण्याचे आदेश महावितरणला दिले होते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतरही फडणवीस यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत महावितरणाकडून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडण्याचे काम सुरूच आहे. हिंगोलीतील एका शेतकऱ्याच्या शेतातील पंपाचे वीजबिल थकल्यामुळे त्याची वीड तोडण्यात आली. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने थेट देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दशरथ मुळे (Dasharath Muley) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज जोड थकीत बिलामुळे तोडू नये, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या होत्या. मात्र, तरीही महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी माझा कृषी पंपाची वीज तोडली. माझीच नव्हे, इतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापली.

अतिवृष्टीमुळे आधीच माझे नुकसान झाले. सरकारी मदतही काहीच मिळाली नाही, जी तुटपुंजी मदत मिळाली तीदेखील वीजबिल भरण्यातच गेली. वीजबिल भरण्यासाठीही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दादागिरी केली. उपमुख्यमंत्र्यांचे आदेश असतानाही माझी वीज का कापण्यात आली. फडणवीस हे खोटे बोलले. यामुळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दशरथ मुळे यांनी आपल्या तक्रार अर्जात केली आहे.

तसेच, राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातूनही सावरत शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामाची लागवड करत होते. पण महावितरणाकडून थकीत वीज बिलापायी थेट वीज जोडणी तोडण्याचे काम सुरु आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची वीज जोड न तोडण्याचे आदेश दिले असतानाही महावितरणाची कारवाई सुरुच आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी वीजबिल भरुनही वीज कनक्शन तोडण्याचे काम सुरु आहे. महावितरणकडून फडणवीसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT