Abdul Sattar- Raosaheb Danve  Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Abdul Sattar : भाजपचे निष्ठावंत किती अपमान सहन करणार ; सत्तारांना पालकमंत्री पद मिळताच अंबादास दानवेंनी डिवचले..

Jagdish Pansare

Shivsena Politics News : शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल (ता.24) छत्रपती संभाजीनगरला पालकमंत्री द्या, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवून केली होती. या पत्राची दखल म्हणा, की योगायोग अवघ्या काही तासातच राज्याच अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे संभाजीनगरचे पालकमंत्री पद दिल्याची घोषणा झाली.

खरतर दानवे यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन सत्तारांची नेमणूक करुन जिल्ह्याच्या विकास कामांना वेग देण्याचा प्रयत्न केला म्हणून अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आभार व्यक्त करायला हवे होते. पण मागणी पुर्ण झाल्यावरही अंबादास दानवे यांनी सत्तार यांच्या नियुक्तीवरून भाजपला डिवचण्याची संधी सोडली नाही.

भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काही दिवसापुर्वी अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केल्याची टीका केली होती. त्याच अब्दुल सत्तार यांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने देण्यात आल्याचे सांगत भाजपच्या निष्ठावंतानी अजून किती अपमान सहन करायचा, अशा शब्दात डिवचले.

या संदर्भात अंबादास दानवे यांनी ट्विट करत रावसाहेब दानवे, (Raosaheb Danve) पालकमंत्री पदासाठी इच्छूक असलेले अतुल सावे आणि जिल्ह्यातील भाजप नेत्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी अजुन किती अपमान सहन करावा. भाजपाचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोड पाकिस्तान झाले असल्याचे म्हटले होते.

त्यांच्या शब्दाला कसलीही किंमत न देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने मुख्यमंत्र्यांनी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती केली. भाजपाचे सरकार असून भाजप मंत्र्यांच्या हातात आता काहीही कारभार राहिलेला नाही.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या शब्दाला कोणीही किंमत देत नसून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर रावसाहेब दानवे यांनी गंभीर आरोप करून शेवटी सत्तार यांची पदोन्नती करण्यात आली आहे. खरच महायुतीच्या शासनात भाजपाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे ऐकले जात आहे का ? हा मोठा प्रश्न आहे, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.

जिल्ह्याच्या विकास कामांवर परिणाम होत असल्याचे सांगत अंबादास दानवे यांनी पालकमंत्र्यांची तातडीने नियुक्ती करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर त्यांची ही इच्छा मुख्यमंत्र्यांनी पुर्ण केली आणि त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले.

तर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मेहनतीमुळे संदीपान भुमरे यांचा विजय झाला, त्याचे बक्षिस म्हणून पालकमंत्री पद भाजपकडे म्हणजेच अतुल सावे यांच्याकडे द्यावे, अशी मागणी भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली होती. जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडला होता.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊन विकासाचे नियोजन, निधीचे वाटप केले जावे, याची जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही आमदारांना घाई आहे. पालकमंत्री नियुक्त न केल्यास जिल्हा नियोजन समितीचा निधी अखर्चित राहण्याची भिती अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून व्यक्त केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT