Manoj Jarange Patil sarkaranama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : लोकसभेला झटका दिल्यानंतर आता जरांगेंनी बीडमध्येच पुन्हा ठरवलं, विधानसभेला कुणाला पाडायचं...

Deepak Kulkarni

Beed News : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून मोठा लढा उभारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठवाड्यात शांतता रॅली काढली आहे.या रॅलीद्वारे त्यांनी सरकारची पुन्हा धडधड वाढवली आहे.या रॅलीने आरक्षणासाठीचा महायुती सरकारवर दबाव वाढवण्यात जरांगे यशस्वी ठरले आहेत. लोकसभेला पराभवाचा झटका दिलेल्या जरांगेंनी आता बीडमधून पुन्हा एकदा पाडायचा इशारा दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीतही जो मराठ्यांना त्रास देईल त्याला पाडायचंच असंही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले आहेत. मराठा समाजाला त्रास देणारा बीड जिल्ह्यातला एकही जण जिंकता कामा नये असं विधान करत जरांगेंनी टीकेची तोफ डागली आहे.

मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली गुरुवारी (ता.11) बीड शहरात दाखल झाली. यावेळी लाखोंच्या संख्येने मराठा समाज या रॅलीत सहभागी झाले. भगवे झेंडे, बॅनरबाजी शहरात पाहायला मिळाली.यावेळी जरांगेंनी आपल्या भाषणात मंत्री आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) सडकून टीका केली.यावेळी आमचा विरोध फक्त छगन भुजबळांना आहे. कारण त्यांनीच मराठा आरक्षणाला विरोध केला.बाकी कुणाला विरोध नाही असेही ते म्हणाले.

जरांगे म्हणाले, मी आजही सांगतो,सर्वसामान्य ओबीसी समाज बांधव आणि आम्ही एकच आहोत.पण भुजबळांनी सर्व ओबीसी नेते एकत्र आणत मला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. जातीय दंगली झाल्या पाहिजेत अशी सरकारची इच्छा आहे. सरकारला भुजबळांच्या माध्यमातून जातीय दंगली घडवायच्या आहेत.मराठ्यांच्या नोंदीसुद्धा रद्द करा अशी त्यांची मागणी आहे.त्यांना साथ द्यायची नाही, त्यांना पाडायचंच असा इशाराही जरांगेंनी आपल्या भाषणावेळी दिला.

धनगर समाजाला मराठा आरक्षणामुळे कोणताही धोका नाही.फक्त छगन भुजबळ सांगतात म्हणून ते नेते आपल्याला विरोध करतात असेही त्यांनी सांगितले.जर ओबीसी नेत्यांना त्यांच्या जातीचा गर्व असेल तर मलाही माझ्या जातीचा गर्व आहे असंही जरांगे म्हणाले. कुणावर जर अन्याय होत असेल तर बघ्याची भूमिका घेऊ नका,वेळ सगळ्यांवर येते.मराठा समाजातील गरीबांनी गरीबांना साथ द्यावी,श्रीमंत मराठे आपल्या मदतीला येणार नाहीत.

मनोज जरांगे पाटलांनी बीडमधील भाषणात जिल्ह्यातील नेत्यांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, त्यांच्या जातीची त्यांना मस्ती आहे. त्यांची लोकसभेला जिरवलीय,आता विधानसभेलाही पुन्हा एकदा जिरवायचीच.मराठ्यांचं नुकसान करणाऱ्यांना माफ करायचं नाही.मराठ्यांना विरोध करणारा मराठा असला तरी त्याला विरोध करायचा,त्याला सत्तेत जाऊ द्यायचं नाही असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT