Ambedkar-Thackeray-Imtiaz News, Aurangabad
Ambedkar-Thackeray-Imtiaz News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aimim : ठाकरे-आंबेडकरांची एकमेकांना साद, तर एमआयएमची पुन्हा वंचित सोबत जाण्याची इच्छा..

Jagdish Pansare

औरंगाबाद : प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकेतस्थळाच्या कार्यक्रमानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar काल मुंबईत एकाच व्यासपीठावर आले होते. राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीची चर्चा सुरू असतांना आलेला हा योग भविष्यातील नव्या राजकारणांची नांदी ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात एकमेकांना एकत्र येण्याची साद घातली. त्यामुळे शिवसेना आणि वंचित लवकरच युती करणार अशा चर्चांना उधाण आले.

एकीकडे ठाकरे-आंबेडकर एकमेकांना साद घालत असतांना दुसरीकडे वंचितचा जुना मित्र पक्ष असलेल्या एमआयएमने (Aimim) देखील पुन्हा प्रकाश आंबेडकरांच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी `सरकारनामा`शी बोलतांना तशी भूमिका मांडली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने मोठे वादळ निर्माण केले होते.

प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभांनी राज्यात मोठी हवा निर्माण करत विरोधकांना धडकी भरवली होती. समाजातील वंचित घटकांना सत्तेच्या सोपानात बसवण्याचा निर्धार करत हे दोन पक्ष एकत्रित आल्याने राज्यात दलित-मुस्लिम मतांची वोट बॅंक तयार झाली होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विजय मिळवत या नव्या युतीने खातेही उघडले होते. परंतु एमआयएमला दलितांची मते मिळाली, पण मुस्लिमांनी मात्र वंचितला मतदान केले नाही, असा आरोप झाला.

प्रकाश आंबेडकरांचा दोन्ही मतदारसंघातून पराभव झाला आणि राज्यात परिवर्तन घडवण्यासाठी एकत्रित आलेल्या या दोन पक्षांची युती अल्पजीवी ठरली. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपांच्या वादाने वंचित-एमआयएमची युती तुटली. त्यानंतर वंचितने महाविकास आघाडीतील काॅंग्रेसपुढे मैत्रीचा हात केला, पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर नव्या मित्राच्या शोधात असतांना त्यांनी शिवसेनेचा पर्याय खुला ठेवला.

या संदर्भात ठाकरे यांच्याशी प्राथमिक बोलणी झाल्याचे देखील बोलले जात आहे. काल तर हे ठाकरे-आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांनी एकत्रित येण्याची इच्छा देखील व्यक्त केली. या राजकीय घडामोडीवर एमआयएम-वंचित आघाडीचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. इम्तियाज जलील म्हणाले, २०१९ मध्ये एका चांगल्या हेतून एमआयएम आणि वंचित आघाडी एकत्र आले होते. वंचित, गरीब, बारा-बलुतेदारांना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार करत प्रकाश आंबेडकर व आमचे नेते ओवेसी यांनी नव्या राजकीय समीकरणाची जुळवणी केली होती.

दलित आणि मुस्लिमांची शक्ती एकवटल्यामुळे सर्वसामान्य, गोरगरिबांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आम्ही औरंगाबाद लोकसभेची जागा जिंकली. परंतु नंतर झालेल्या काही गैरसमज आणि मतभेदातून विधानसभेला आमची युती तुटली. काही चुका झाल्या असतील परंतु त्या एकत्रित बसवून सोडवता आल्या असत्या. प्रकाश आंबेडकरांनी आता शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. एक स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून प्रकाश आंबेडकरांचा तो अधिकार निश्चितच आहे.

आमची अजूनही इच्छा आहे, की त्यांनी एमआयएमला सोबत घ्यावे आणि पुढचा लढा लढावा. मी आजही स्वतःला वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युतीचाच खासदार समजतो. ज्या हजारो, लाखो दलित बांधवांनी मला लोकसभा निवडणुकीत मतदान केले, त्यांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही. आंबेडकरांनी ठाकरेंपुढे मैत्रीचा हात केला असला तरी आमची अजूनही वंचित सोबत जाण्याची इच्छा असल्याचा पुनरुच्चार देखील इम्तियाज यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT