BJP, NCP, Congress, Shivsena  Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Politics: धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले; पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांनाही वेग

सरकारनामा ब्यूरो

Dharashiva News : आगामी लोकसभा निवडणुकीला अद्याप जवळपास एक वर्षाचा कालावधी असतानाही आतापासूनच राजकीय पक्ष तयारीला लागल्याचे चित्र आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघनिहाय आढावा घेण्यास सुरवात केली आहे.

असेच काहीसे चित्र धाराशिव जिल्ह्यातही असून धाराशिव लोकसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विजयाच्या 'दहीहंडी'साठी आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटण्यास सुरवात केली आहे.

शिवसेनेचे दोन गट, राष्ट्रवादीचे दोन गट, भाजप आणि काँग्रेसनेही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरु केल्या आहेत. भाजपने संताजी चालुक्य यांच्या माध्यमातून नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. तर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी धाराशिव लोकसभा काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे सांगितले.

दुसरीकडे शिवसेनेचे (ठाकरे गट) विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही तयारी सुरु केली आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनीही धाराशिव लोकसभेवर दावा केला आहे. त्यांनीही विधानसभानिहाय नियुक्त्यांचा धडाका लावला आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात उमरगा-लोहारा, तुळजापूर, भूम-परंडा, बार्शी, धाराशिव आणि औसा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. यामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील (भाजप), आमदार ज्ञानराज चौगुले (शिवसेना- शिंदे), आमदार अभिमन्यू पवार (भाजप), आमदार कैलास पाटील (शिवसेना-ठाकरे), भूम-परंडाचे आमदार आणि पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत या नेत्यांचा समावेश होतो. पण, धाराशिव मतदारसंघात दोन वेळा शिवसेनेने बाजी मारली होती.

युतीच्या काळात हा मतदारसंघ शिवसेनेचा होता. सध्याच्या परिस्थितीनुसार भाजपने बुधनिहाय नियुक्या सुरु केल्या आहेत. कमजोर बुधमध्ये गाठीभेठी सुरु केल्या आहेत. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकप्रमुख काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी गेल्याच आठवड्यात धाराशिवमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन खासदार आमचाच होणार, असल्याचा दावा केला.

त्यानंतर दोन दिवसापूर्वी तुळजापूर तालुक्यातील ७५ गावाच्या सरपंचांनी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी निवडणूक लढवावी म्हणून निवेदन देऊन आग्रह धरला. जिल्हाभर काँग्रेसनेही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरु केल्या आहेत. वेगवेगळे सर्वेक्षण, गाठीभेठी घेऊन आढावा घेतला जातो आहे.

दुसरीकडे आघाडीच्या काळात धाराशिव मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षाकडे होता. मात्र, अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदारही त्यांच्या सोबत गेले. तर शरद पवार गटानेही माजी आमदार राहुल मोटे यांच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्याता प्रयत्न सुरू केला आहे. या सर्व राजकीय हालचाली पाहिल्या तर आगामी धारशिव लोकसभेही 'हंडी'फोडण्यासाठी पक्ष आणि गटातटाच्या राजकारणामुळे कोण-कोणासोबत कशी 'अंडरस्टॅंडींग' ठेवतो, त्यावरच येत्या निवडणुकीचे यश अवलंबून असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT