Shivsena News : उद्धव ठाकरे हे बादशाह सारखे वागतात, त्यांना कधी कोणाचे ऐकून घेण्याची सवयच नाही, म्हणूनच आम्हाला उठाव करावा लागला. आता अंबादास दानवे म्हणतात, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत खरतरं त्यांनी हे त्याचे नेते उद्धव ठाकरे यांना सांगितले पाहिजे, असा टोला समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला. मी चाळीस वर्षापासून शिवसेनेत आहे, अंबादास दानवे यांच्या वार्डात जेव्हा मी शाखा स्थापन केली तेव्हा ते आठवीत होते. मला ते खूप ज्युनिअर आहेत, असेही शिरसाट म्हणाले.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काही दिवसापुर्वी शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. तुम्हालाही तसंच वाटतं का? असा प्रश्न जेव्हा संजय शिरसाट यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दानवे यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे हे आमचं ऐकत नव्हते, म्हणूनच आम्हाला उठाव करावा लागला होता. आजही तीच परिस्थिती कायम आहे, काही बदल झालेला नाही.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जेव्हा सर्व आमदार आम्ही बाहेर पडलो तेव्हा मी पहिल्यांदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खुले पत्र लिहून काही प्रश्न विचारले होते. आजही मी टारगेट केला जातो, कारण शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून पक्षाची ध्येय धोरणं, विचार आणि विरोधकांनी केलेल्या आरोप आणि टीकेला उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. सहाजिकच त्यामुळे माझे विरोधकही मोठ्या प्रमाणात तयार झाले, त्यातून माझ्यावर खोटे आरोप, खोट्या तक्रारी, कोणाला तरी कामाला लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मी सध्या वादग्रस्त आणि सर्वाधिक चर्चेत असणारा मंत्री ठरतोयं, असेही संजय शिरसाट म्हणाले. माझ्यावर केल्या जाणाऱ्या आरोपाने मला निश्चित त्रास होतो, पण राजकारणात हे सहन करावं लागतं.
बाळासाहेब ठाकरेंनी मला उमेदवारी दिली..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माणसं जपली. काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे त्यांचे लक्ष असायचे. ज्या बाळासाहेबांना भेटायला लोक तरसायचे, त्या साहेबांसोबत दोन-दोन तास वेळ घालवण्याची संधी मिळालेला मी भाग्यवान माणूस आहे. मी विधानसभा निवडणूक चारवेळा लढलो. बाळासाहेब असताना पहिल्यांदा जेव्हा मला उमेदवारी मिळाली तेव्हा पक्षात मोठी स्पर्धा होती, दिग्गज लोक उमेदवारीसाठी रांगेत होते. पण बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले, की तिकीट संजयला द्यायचे आणि ते मला मिळाले.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मी दहा वर्ष नगरसेवक होतो. दोनवेळा महापौर होण्याची संधी मिळाली, पण मला महापौर होता आलं नाही. राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. रिक्षा चालवणारा, सात रुपये रोजाने कंपनीत काम करणारा, भाजी विकणारा माणूस आज मंत्री झालेला दिसतो, त्याचे पद, सत्ता, संपत्ती दिसते पण त्यामागे मी केलेली मेहनत, संघर्ष कोणाला दिसत नाही, अशी नाराजीही संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. माझ्यावर केले जाणारे आरोप बिनबुडाचे, सूड भावनेने केले जात आहेत. मी काही चुकीचं वागलो असेल तर मंत्रीच काय, आमदारकीचा ही राजीनामा देईन, पण खोटे आरोप करून जर कुणी माझे करिअर संपवू पाहत, असेल तर ते सहन करणार नाही, असेही शिरसाट यांनी निक्षून सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.