शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर महाराष्ट्रात ‘जंगलराज’ निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला.
अनगर नगरपंचायत बिनविरोध करण्याच्या भाजपच्या अट्टाहासामागे राजकीय दबाव आणि सत्तेचा गैरवापर असल्याचे दानवे यांनी म्हटले.
या प्रकरणामुळे अनगर आणि आसपासच्या परिसरात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Shivsena UBT News : अनगर नगरपंचायतीची निवडणुक बिनविरोध केल्याचा दावा करत गुलाल उधळणाऱ्या भाजपाला ऐनवेळी आपटी खावी लागली. एका महिला उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे भाजपचा बिनविरोधचा दावा थोड्यावेळातच फुसका ठरला. प्रचंड पोलीस बंदोबस्तात महिला उमेदवाराला भल्या पहाटे आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला, याचा हवाला देत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्रात भाजपमुळे जंगलराजचा बिगुल वाजू लागला, असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायत बिनविरोध निवडून आणल्याचा दावा करत गुलाल उधळला. परंतु उज्वला थिटे या महिला उमेदवाराने अर्ज दाखल केल्यामुळे आता इथे एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. 17 पैकी 16 उमेदवार बिनविरोध निघाले असले तरी आता एका जागेसाठी मतदान होणार आहे.
अंबादास दानवे यांनी यावरून भाजपवर टीका करताना महाराष्ट्रात जंगलराजचे बिगूल या निमित्ताने वाजू लागल्याची टीका केली. अनगर (ता. मोहोळ) येथील प्रकरण भयंकर आहे. 'जंगलराज' शब्दावर बिहारच्या निवडणुका लढणाऱ्या भाजपमुळे महाराष्ट्रात जंगलराजचा बिगुल वाजू लागला आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात एका महिलेला बंदूकधारी पोलिसांच्या संरक्षणात पहाटेच्या अंधारात निवडणूक अर्ज भरण्यासाठी जावे लागते.
ही महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था, लोकशाहीची भाजप आणि त्यांच्या पिल्लावळीने केलेली शुद्ध ऐशी-तैशी आहे! निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांचे कर्तृत्व लागते. ज्याचे कार्यकर्तेच स्वतःच्या तालमीत घडलेले नाहीत, तिथे कर्तृत्वाचा काय संबंध. भाजपचे खरे कार्यकर्ते हे कसं सहन करतात, देव जाणे, असा टोलाही दानवे यांनी लगावला.
दुसरीकडे शिंदेंच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यावरही दानवे यांनी भाष्य केले. भाजपने मिंधे गँगची गाजराची पुंगी कधीच केली होती. आता फक्त ती मोडून खायला भाजपने सुरू केली आहे, एवढंच! या रुसू बाई रुसू कार्यक्रमाचा फटका मात्र महाराष्ट्राच्या जनतेला बसतो आहे, असा चिमटा या नाराजी नाट्यावरून दानवे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला काढला.
ब्रिटीश मानसिकतेचे सरकार
कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर तोंड धरून व्यापाऱ्यांचा मारा करणं कोणी या भाजप सरकार कडून शिकाव! महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी 5 क्विंटल (प्रति एकरी एकर) एवढाच कापूस हमीभावाने विकू शकेल, असा अजब आणि जुलमी फतवा या सरकारने काढला आहे! उरलेला कापूस व्यापाऱ्यांच्या घशात घाला आणि तोटा सहन करा, असा रझाकारी नियम या सरकारने आता आणला आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या उत्पन्नावर हा सरकारी दरोडा आहे.
गल्ली ते दिल्ली कैफियत मांडूनही शेतकऱ्यांचे हे सरकार ऐकत नसेल तर हे सरकार भारतीय वंशाचे पण ब्रिटिश मानसिकतेचे आहे. शेतकऱ्यांना अगोदर अस्मानी संकटाने मारले, आता सरकारची सुलतानी त्यांच्या जीवावर उठली आहे. अधिकचा कापूस पिकला, हा शेतकऱ्याचा दोष आहे का? ही मर्यादा सरकारने तात्काळ हटवावी आणि शेतकाऱ्यांकडून एकरी 12 क्विंटल कापूस हमीभावाने घ्यायला सुरुवात करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
1. अंबादास दानवे यांनी भाजपवर जंगलराजाचा आरोप का केला?
राजकीय दबाव, धमक्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत त्यांनी हा शब्द वापरला.
2. अनगर नगरपंचायत बिनविरोध करण्यामागे काय कारण सांगितले जात आहे?
भाजप स्थानिक स्तरावर सत्ता टिकवण्यासाठी इच्छुकांना माघारी खेचत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो.
3. या प्रकरणावर भाजपची काय प्रतिक्रिया आहे?
भाजप नेहमीप्रमाणे आरोप फेटाळत असून, लोकांनी स्वेच्छेने निर्णय घेतल्याचा दावा करतात.
4. अनगरमध्ये या वादामुळे काय परिणाम झाले?
स्थानिक स्तरावर राजकीय ध्रुवीकरण वाढले असून विरोधी पक्षांचे आंदोलन आणि टीका तीव्र झाली.
5. या प्रकरणामुळे शिवसेना-भाजप संघर्षावर काय प्रभाव पडेल?
दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो आणि आगामी निवडणुकांवरही त्याचा थेट परिणाम दिसू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.