Shivsena UBT News : आस्मानी आणि सरकारच्या सुलतानी संकटात कायम सापडलेल्या शेतकऱ्यांवर मरणाला जवळ करण्याची वेळ आली आहे. गेल्या चारच महिन्यात राज्यात एक हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. नैसर्गिक आपत्तीमुळे 54 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानी पोटीचे 13 हजार कोटी रुपये सरकारने अद्याप वाटपच केले नाही. सरकारने बघ्याची भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप दानवे यांनी केला.
मुंबईत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी महायुती सरकारला धारेवर धरले. जानेवरी ते एप्रिल 2025 या चार महिन्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती देत दानवे यांनी याला महायुती सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. त्यामुळे या कालावधीत 1 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे.
मार्च 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना एकूण 13 हजार 819 कोटी रुपये अद्याप वाटप होणे बाकी आहे. (Farmers) पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर सरकार पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे, हे अन्यायकारक असून याविरोधात आवाज उठवण्याचा इशाराही दानवे यांनी दिला. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
अजित पवार फेल..
बीड जिल्ह्यात कायद्याचे राज्य आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशा घटना तिथे घडत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार आहे. ज्यांना अटक केली त्यांना व्हिआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप होतो आहे. मकोका सारखे गुन्हे दाखल केल्यानंतरही बीड जिल्ह्यातील टोळी युद्ध थांबायला तयार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड चे पालकमंत्री झाल्यावरही परळीमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न गंभीर असल्याचे दानवे म्हणाले.
केंद्राकडून महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये घट झाल्याचा आरोप करतानाच डबल इंजिन सरकारला केंद्राची साथ खरचं मिळते आहे का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. सोलापूर एमआयडीसीत लागलेल्या आगीत जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पंढरपूरहुन रूग्णवाहिका आणावी लागली, यावरून दानवे यांनी राज्यातील एकूण एमआयडीसींच्या सुरक्षा व उपाय योजनांबाबत सरकारला धारेवर धरले. जनतेचा विरोध असताना ही विविध विकासकामांच्या नावाखाली सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठया प्रमाणात सुरू आहे.
गुत्तेदारांच साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला. तसेच देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या राजशिष्टाचारात निष्काळजीपणा केला व त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर सरकारने पत्रक काढलं. या चुकीवर पांघरूण घालून चालणार नाही, चुकीला माफी नाही असे म्हणत विरोधी पक्ष म्हणून आम्ही याविरोधात भूमिका घेऊ असे दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.