Amit Deshmukh-Ashok Chavan News, Aurangabad
Amit Deshmukh-Ashok Chavan News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Amit Deshmukh : आमचं बरं चाललंय हे काहीजणांना पाहवत नाही...

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात गाजली ती तिला मिळालेल्या प्रतिसादामुळे. या शिवाय नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात अनुक्रमे अशोक चव्हाण आणि लातूरचे अमित देशमुख यांच्या सवता सुभामुळे देखील या यात्रेची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. देशमुख-चव्हाण यांच्यातील राजकीय मतभेदामुळेच देशमुख नांदेडात आणि चव्हाण हिंगोली जिल्ह्यात गेले नव्हते, अशा चर्चा या यात्रे दरम्यान झाल्या.

आता महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा टप्पा संपून राहुल गांधी मध्यप्रदेशमध्ये दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा संपल्यानंतर आठवड्याभराने माजी मंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी चव्हाण (Ashok Chavan) आणि देशमुख यांच्यातील मतभेदाच्या वृत्तावर स्पष्टीकरण दिले आहे. आमचं बरं चाललंय, ते काहीजणांना बघवत नाही, म्हणूनच मतभेदाच्या वावड्या उठवल्या गेल्याचा आरोप त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केला आहे.

नांदेड-लातूर मतभेदाचे वृत्त निराधार आणि तथ्यहीन असल्याचे अमित देशमुख यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे मतभेद नाही हे दर्शवण्यासाठी त्यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. तेलंगणा राज्यातून भारत जोडो यात्रेचे आगमन देगलूरमार्गे महाराष्ट्रात झाले. नांदेड जिल्ह्यातील ही यात्रा पाच दिवस आणि चार रात्र मुक्कामी होती. या संपुर्ण यात्रेचे नांदेड जिल्ह्यातील नियोजन, सभा याची संपुर्ण जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर होती.

पाच दिवस राज्य आणि देशातील काॅंग्रेसचे बहुतांश नेते नांदेडमध्ये होते. मात्र शेजारच्या लातूरचे अमित आणि धीरज हे देशमुख बंधू नांदेड जिल्ह्यात फिरकले नव्हते. यामागे आमच्याकडे हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी होती असे सांगितले गेले. पंरतु विदर्भातील जबाबदारी असलेले अनेक काॅंग्रेसचे नेते नांदेडमध्ये दाखल झाले होते. या शिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे देखील नांदेडमध्ये येऊन राहुल गांधीची भेट घेऊन गेले. त्यामुळे चव्हाण यांच्याशी असलेल्या राजकीय मतभेदातूनच देशमुखांनी नांदेडला येणे टाळले अशा चर्चांना उधाण आले होते.

तर हिंगोलीची जबाबदारी लातूरच्या देशमुखांकडे असल्यामुळे अशोक चव्हाण तिकडे फिरकले नव्हते ही वस्तुस्थिती होती. परंतु असे असले तरी आमच्यात कुठलेच मतभेद नाहीत, असा दावा करत अमित देशमुख यांनी पोस्ट शेअर करत या चर्चांचे खापर प्रसार माध्यमांवरच फोडले आहे. देशमुख आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा अभूतपूर्व प्रतिसादाने महाराष्ट्रात यशस्वी ठरलेली आहे.असे असताना काही प्रसार माध्यमातून या निमित्ताने नांदेड-लातूर जिल्ह्यात मतभेद उघड झाल्यासंबंधीचे प्रसिद्ध झालेले वृत्त तथ्यहीन आणि निराधार आहे.

भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आली असता तेथील स्वागताची जबाबदारी मा.अशोकरावजी चव्हाण यांच्यावर तर नांदेडला लगत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात यात्रेचे स्वागत करण्याची जबाबदारी लातूर जिल्ह्यावर होती. त्यामुळे नांदेडच्या कार्यक्रमाला जाता आले नाही, ही वस्तुस्थिती लक्षात न घेता माध्यमातून नांदेड-लातूर तसेच मा.अशोकरावजी चव्हाण आणि मी यांच्यात मतभेद आणि दुरावा निर्माण झाल्याच्या संदर्भाने प्रसिद्ध झालेले वृत्त तथ्यहीन आणि वस्तुस्थितीपासून कोसो दूर आहे.

वास्तविक पाहता चव्हाण-देशमुख कुटुंबीयांचे संबंध हे अनेक दशकांपासूनचे आहेत.या दोन्ही कुटुंबामध्ये ओलावा जिव्हाळा प्रेम आणि सन्मान होता,आहे आणि पुढेही तो कायम राहणार आहे.ही वस्तुस्थिती लक्षात न घेता कारण नसताना मतभेदाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अशोकरावजी चव्हाण आणि मी यांच्यात बरे चालले आहे हे काही जणांना पहावत नाही हेच यातून स्पष्ट होत आहे. भारत जोडो यात्रेचे यश,महाराष्ट्रात या यात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तर असे वृत्त प्रसिद्ध केली जात नाहीत ना ? असा प्रश्नही माझ्यासारख्याच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT