Maharashtra politics : राज्यात ठाकरे अन् पवार परिवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यात आणखी एक राजकीय राजकीय परिवार एकत्र येणार का? रिपल्बिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोठं विधान केलं.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्यासाठी टाळी देताना, 'हो, राजकारणामध्ये सर्व प्रकारच्या शक्यता असतात', असे सूचक संकेत दिले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाकरे आणि पवार कुटुंब एकत्र येत असतील, तर मला देखील प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घ्यावं लागेल, अशी प्रतिक्रिया दिली होती. याचे पडसाद उमटत असतानाच, आनंदराज आंबेडकर यांनी आठवलेंचा शह देणारी प्रतिक्रिया देत, आपले थोरले बंधू प्रकाश आंबेडकर यांना टाळी देण्यासाठी हात पुढं केला आहे.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, "हो, राजकारणामध्ये सर्व प्रकारच्या शक्यता असतात. आपण पाहिलं असेल, दोन्ही पवार (Sharad Pawar) एकत्र येतील असं वाटलं नव्हतं, ठाकरे बंधू कधी एकत्र येतील, असं वाटलं नव्हतं. पण आज चर्चा चालू आहे. त्यामुळे राजकारणामध्ये काहीच अशक्य नाही".
प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर एकमेकांचे भाऊ आहेत. ते यशवंत आंबेडकर यांचे पुत्र, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. आनंदराज हे प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज यांनी 'रिपब्लिकन सेना' नावाचा राजकीय पक्ष स्थापन केलेली आहे. त्यांनी 1998 मध्ये 'रिपब्लिकन सेना' नावाचा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत.
प्रकाश आंबेडकर हे राज्यात बाळासाहेब आंबेडकर नावानं लोकप्रिय आहेत. सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. ते वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा, असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य राहिलेले आहेत. 1994 पूर्वी भारतीय रिपब्लिकन पक्ष, 1994 ते 2019 पर्यंत भारिप बहुजन महासंघ आणि पुढे 2019 पासून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे.
आनंदराज आंबेडकर वंचित आघाडीतून 2020 मध्ये बाहेर पडले. नागपूरमध्ये फेब्रुवारी 2020 पत्रकार परिषद घेत वंचितमधून बाहेर पडल्याचे कारण सांगताना, वंचितला येत असलेले अपयश आणि त्यांच्याबरोबर असलेल्या घटक पक्षांना विश्वासात घेतले जात नसल्याचे कारण दिले. असं असलं तरी, लोकसभा निवडणुकीत आनंदराज यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला होता.
राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकीय प्रयोगानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. महायुती सरकार येण्यापूर्वी राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यात आली. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून अजित पवार बाहेर पडले. आता मात्र ठाकरे बंधू परिवार आणि पवार परिवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे. यातच आंबेडकर बंधू देखील एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आनंदराज यांनी त्यांचे थोरले बंधू प्रकाश आंबेडकरांना टाळी दिली आहे. याला प्रकाश आंबेडकरांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहण्यासारखे राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.