Pasha Patel Sarkarnama
मराठवाडा

Latur News : डझनभर मंत्री, अधिकाऱ्यांचा राज्यात आता बांबू टास्क फोर्स...

राम काळगे

Latur News : राज्यामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देवून त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. 20 जणांची ही समिती असून बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बांबू लागवडीचा वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन करणार असल्याची माहीती राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्समध्ये, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सहअध्यक्ष असतील. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, जलसंधारण मंत्री संजय राठोड, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे या मंत्र्यांचाही यामध्ये समावेश आहे.

तसेच राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel), महसूल, वने, नगर विकास, ग्रामविकास, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, जलसंधारण, आदिवासी विकास, कृषी आणि पदुम विभागाच्या सचिवांचा यात समावेश आहे. एकूण वीस सदस्य असलेल्या या टास्क फोर्स मध्ये रोजगार हमी आणि नियोजन विभागाचे प्रधान सचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना दुष्काळ आणि अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटांना सामोरे जावे लागले. बांबू हे पीक कमी पाणी वापरणारे तसेच जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे असल्यामुळे पर्यावरण स्नेही आहे. राज्यभरात बांबू लागवड केल्यास वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्याबरोबरच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या टास्कफोर्सची बैठक तीन महिन्यातून किमान एकदा होणार आहे. टास्क फोर्सची स्थापना ही महाराष्ट्रातील परिवर्तनाची मोठी घटना असून या निमित्ताने शाश्वत शेती विकासाचे पर्व सुरू होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालय मार्फत बांबूच्या औद्योगिक धोरणाची सुरुवात करण्यात आली आहे. बांबू टास्क फोर्स मध्ये नॅशनल रेनफेड एरिया ऑथॉरिटी सीईओ अशोक दलवाई व इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्सचे माजी अध्यक्ष के.जी.पी. रेड्डी सहभागी होणार आहेत.

देशातील नामवंत व्यक्ती, शात्रज्ञ, पर्यावरण तज्ञ अशा निवडक व्यक्तींचा टास्क फोर्समध्ये समावेश असणार आहे. आसाममध्ये न्युमालीगड येथे नेदरलँड,फिनालँड व भारत सरकारच्या संयुक्त विद्यमाने बांबूपासून इथेनॉल निर्मिती करणा-या आसाम बायोरिफायनरीचे मार्चमध्ये उद्घाटन होणार आहे.

एनटीपीसी भारत सरकार यांनी देशातील सर्व वीज निर्मिती करणाऱ्या औष्णिक केंद्रामध्ये ७% बायोमास म्हणून बांबूच्या वापरास मान्यता दिली आहे. याशिवाय भारतीय रिजर्व बँक यांनी व्हेईकल लोनप्रमाणे बांबूपासून पलेट बनविणाऱ्या उद्योगांना प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे. तर भारत सरकार बांबू च्या संशोधनासाठी एक हजार कोटींचा निधी देणार असल्याचेही पाशा पटेल यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT