Ashok Chavan_Modi-Shah_Ram Mandir 
मराठवाडा

Ashok Chavan: अशोक चव्हाणांकडून 'जय श्रीराम'चा नारा! मोदी-शहांचं केलं तोंडभरुन कौतुक; E-20 प्रयोगाचंही केलं समर्थन

Ashok Chavan: भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णायांचे कौतुक करत कलम 370 हटवल्याच्या आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमीपूजनाच्या ऐतिहासिक दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Jagdish Pansare

Ashok Chavan: भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णायांचे कौतुक करत कलम 370 हटवल्याच्या आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमीपूजनाच्या ऐतिहासिक दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले होते. यानिमित्त अशोक चव्हाणांनी आठवणींना उजाळा दिला.

हा दिवस देशवासियांसाठी ऐतिहासिक होता, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी 'जय श्रीराम'चा नाराही दिला. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते अयोध्या धाम येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे भूमीपूजन झाले. हा दिवस फक्त भूमीपूजनाचा नाही, तर भाजपा परिवाराच्या 'संकल्प से सिद्धी तक' या मूलमंत्राचा पुरावा आहे. हे स्वप्न सत्यात उतरणं म्हणजे श्रद्धा, संयम आणि अखंड प्रयत्नांची फलश्रुती, असल्याचे गौरवोद्दगार चव्हाण यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टवरून काढले आहे. याशिवाय कलम 370 हटवण्याचा निर्णय हा नव्या जम्मू-काश्मीरच्या विकासाचा निर्णायक टप्पा ठरला असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ठाम निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक आणि बंदची संस्कृती मागे पडून शांतता, विकास, पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

भारतीय संविधानाचे समान अधिकार प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत असताना, जम्मू-काश्मीर आज विकसित भारताच्या प्रवासात आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत आहे. विकास, विश्वास आणि सुशासन हाच नव्या जम्मू-काश्मीरचा नवा चेहरा मोदीजी आणि अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात कलम 370 आणि 35-अ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

यातून जम्मू-काश्मीरला विकास, सुशासन आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यात आले. एक राष्ट्र, एक संविधान, एक निशाण या संकल्पनेला बळ देणाऱ्या या ऐतिहासिक दिवसानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा, असा संदेशही अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

E-20 प्रयोगाचं केलं समर्थन

E-20 इंधन हा कोणताही प्रयोग नाही. 2001 मध्ये E5 पासून सुरू झालेला प्रवास, वैज्ञानिक संशोधन, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज E20 पर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नवे बाजार, इंधन आयातीवरील अवलंबित्वात घट आणि स्वच्छ पर्यावरण या तिन्ही उद्दिष्टांना बळ मिळत असल्याचं सांगत त्यांनी सरकारच्या पेट्रोलमधील इथेनॉल ब्लेडिंग कार्यक्रमाचं समर्थन केलं. दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि दीर्घकालीन नियोजनामुळेच मोठे परिवर्तन घडते, असे म्हणत ही पुढील वीस वर्षाची तयारी म्हणजे खऱ्या अर्थाने आजचा आत्मनिर्भर भारत असल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT